
मुंबई : राज्यातील सत्तांतरासाठी कारणीभूत ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीचा थरार पुन्हा एकदा रंगणार आहे. विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. नाशिक आणि अमरावती पदवीधर, औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघांसाठी ही निवडणूक जाहीर झाली आहे.
निवडणूक जाहीर झालेल्या ५ सदस्यांची मुदत ७ फेब्रुवारी २०२३ रोजी संपणार आहे. यात राष्ट्रवादी १, भाजप १, काँग्रेस १ आणि दोन अपक्ष सदस्यांचा समावेश आहे.
अधिसूचना जारी - ५ जानेवारी २०२३
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख - १२ जानेवारी २०२३
उमेदवारी अर्जाची छाननी - १३ जानेवारी २०२३
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख - १६ जानेवारी २०२३
मतदान - ३० जानेवारी २०२३ (सकाळी ८.०० ते दुपारी ४.००)
मतमोजणी - २ फेब्रुवारी २०२३
गतवेळी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत मोठा उलटफेर झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. या निवडणुकीत भाजपने ५ उमेदवार उभे केले होते. हे पाचही उमेदवार निवडून आणण्यात भाजपला यश आलं होतं. पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपकडे पुरेसं संख्याबळ नव्हतं. मात्र, असं असतानाही भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय अचूक अशी रणनिती आखली आणि योग्य वेळी महाविकास आघाडी सरकारचा गेम केला.
या निवडणुकीसाठी भाजपकडे फक्त चार उमेदवार निवडून येतील एवढेच अधिकृत मतदार होते. पण तरीही पाचव्या जागेसाठी प्रसाद लाड यांना उतरविण्यात आलं आणि एकही मत हाती नसतानाही भाजपने आपले पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांना निवडून आणलं. तर संख्याबळ असूनही काँग्रेसचे चंद्रकांत हांडोरो यांचा अत्यंत धक्कादायक पद्धतीने पराभव झाला होता.