हिटमॅनच्या नेतृत्वात टीम इंडिया चमकली, ६ वर्षांनी टी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानावर
कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अखेरच्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर मात करत वन-डे पाठोपाठ टी-२० मालिकाही ३-० च्या फरकाने जिंकली. या कामगिरीच्या जोरावर टीम इंडिया आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानावर आली आहे. तब्बल ६ वर्षांनी भारतीय संघाला टी-२० क्रमवारीत पहिलं स्थान मिळवण्याची संधी मिळाली आहे.
फेब्रुवारी २०१६ मध्ये भारतीय संघ पहिल्या स्थानावर आला होता. इंग्लंडच्यया ओएन मॉर्गनच्या टीमला रोहित शर्माच्या भारतीय संघाने खाली खेचलं आहे. टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान साखळी फेरीमध्येच संपुष्टात आलं. परंतू त्यानंतर भारतीय संघ सलग ९ टी-२० सामने जिंकला आहे. या कामगिरीच्या जोरावर भारताच्या खात्यात २६९ गुण जमा झाले आहेत.
अशी आहे आयसीसीची टी-२० क्रमवारी -
१) भारत - २६९
२) इंग्लंड - २६९
३) पाकिस्तान - २६६
४) न्यूझीलंड - २५५
५) दक्षिण आफ्रिका - २५३
६) ऑस्ट्रेलिया - २४९
७) वेस्ट इंडिज - २३५
८) अफगाणिस्तान - २३२
९) श्रीलंका - २३१
१०) बांगलादेश - २३१
वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेनंतर टीम इंडिया घरच्या मैदानावर श्रीलंकेचा सामना करणार आहे. २४ फेब्रुवारीपासून या मालिकेला सुरुवात असून दोन्ही संघ यात ३ टी-२० आणि २ कसोटी सामने खेळतील.