
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील साखळी सामने बीसीसीआयने कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची भीती लक्षात घेऊन मुंबई आणि पुणे या दोन शहरात आयोजित केले. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेत जातीने आयोजन चोख राहील याची काळजी घेतली. परंतू सध्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या लोडशेडींगचा फटका चक्क आयपीएल सामन्यालाही बसलेला पहायला मिळाला.
गुरुवारी मुंबईच्या वानखेडे मैदानावर चेन्नई विरुद्ध मुंबई सामन्याआधी लाईट गेल्यामुळे DRS ची सिस्टीम कोलमडलेली पहायला मिळाली. ज्याचा फटका चेन्नईच्या संघाला सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये बसलेला पहायला मिळाला.
सामन्याच्या चौथ्या ओव्हरपर्यंत वीजेचा पुरवठा पूर्ववत झाला आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतू या बिघाडामुळे चेन्नई संघाला DRS ची मदत घेता आली नाही. इतकच नव्हे तर या बिघाडामुळे मैदानातील फ्लडलाईटला योग्य पद्धतीने वीजपुरवठा होत नसल्यामुळे टॉसलाही उशीर झाला. मुंबई क्रिकेट असोसिएशनने हा बिघाड होण्यामागे शॉट सर्कीटचं कारण दिलं आहे.
"टॉस होण्याच्या आधी शॉट सर्कीट झालं होतं ज्यामुळे सिस्टीममध्ये काही बिघाड झाले. याच कारणामुळे टॉस उशीरा झाला. एका फ्लडलाईटला पुरेसा वीजपुरवठा मिळत नव्हता. ब्रॉडकास्ट प्रोडक्शन टीमच्या विद्युत पुरवठ्यावरही परिणाम झाला होता. यानंतर आमच्या माणसांनी युद्धपातळीवर काम करत यंत्रणेतला बिघाड दुरुस्त केला आणि ही सर्व यंत्रणा पूर्ववत झाली", अशी माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, डिजेल जनरेटरमध्ये झालेल्या बिघाडामुळे वानखेडे मैदानावर हा खोळंबा झाल्याचं कळतंय. डॅनिअल सम्सच्या बॉलिंगवर चेन्नईचा डेवॉन कॉनवे एकही रन न काढता आऊट झाला. परंतू DRS ची सुविधा नसल्यामुळे चेन्नई सुपरकिंग्ज अंपायरच्या निर्णयाला आव्हान देऊ शकली नाही. दुसऱ्या ओव्हरमध्ये चेन्नईच्या रॉबिन उथप्पालाही जसप्रीत बुमराहले LBW आऊट केलं. यावेळी उथप्पाने लगेच DRS ची मागणी केली.
परंतू तोपर्यंत सिस्टीम पूर्ववत न झाल्यामुळे उथप्पाला पंचांचा निर्णय मान्य करुन मैदान सोडावं लागलं. परंतू यानंतर चौथ्या ओव्हरपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत झाला आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला.