आजोबा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेते, नातवानेही उंचावली भारताची मान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कॅरेबिअन बेटांवर सुरु असलेल्या U-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कमाल करत इंग्लंडला १८९ धावांमध्ये गुंडाळलं. रवी कुमार आणि राज बावा यांच्या जोडीने इंग्लंडच्या डावाला पहिल्या षटकापासून सुरुंग लावायला सुरुवात केली. बावाने इंग्लंडचा निम्मा संघ गारद करत संघाची बाजू वरचढ राखण्यात मोलाची भूमिका बजावली.

राजने अंतिम सामन्यात ५ विकेट घेत आपल्या घरातला क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करण्याचा वारसा पुढे चालू ठेवला. राजचे आजोबा तारलोजन बावा हे ऑलिम्पियन होते. तारलोचन हे भारताच्या महान हॉकीपटूंपैकी एक मानले जायचे. १९४८ साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत बावा यांनी १ गोल झळकावत भारताला सुवर्णपदक जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

राजनेही आपल्या आजोबांचा कित्ता गिरवत अंतिम सामन्यात इंग्लंडचा निम्मा संघ गारद केला. १९४८ साली झालेल्या ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यात भारताने ग्रेट ब्रिटनवर ४-० असा विजय मिळवला होता, त्यामध्ये एक महत्वाचा गोल हा तारलोचन यांचा होता. आपल्या आजोबांबद्दल बोलताना राज नेहमी भावूक होतो. महत्वाची गोष्ट म्हणजे आजोबांप्रमाणे नातवानेही अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध धडाकेबाज कामगिरी करत भारताची मान अभिमानाने उंचावली. राज बावाने ९.५ षटकांमध्ये १ षटक निर्धाव टाकून ३१ धावांत देत ५ बळी घेतले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT