Tokyo Olympics 2020 : भारतीय महिलांची झुंज अपयशी, अर्जेंटिना अंतिम फेरीत दाखल
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांपाठोपाठ भारतीय महिला हॉकी संघालाही पराभवाचा धक्का बसला आहे. ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच उपांत्य फेरीत प्रवेश केलेल्या भारतीय महिला हॉकी संघावर अर्जेंटिनाच्या महिलांनी २-१ ने मात केली. सामन्यात आघाडी घेतल्यानंतर भारतीय महिला नंतर गोल करण्यात अपयशी ठरल्या. दुसरीकडे अर्जेंटिनाने आपला सर्व अनुभव पाणाला लावत पिछाडी भरुन काढत आघाडी घेत अखेरपर्यंत ती कायम राखली. भारतीय […]
ADVERTISEMENT

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांपाठोपाठ भारतीय महिला हॉकी संघालाही पराभवाचा धक्का बसला आहे. ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच उपांत्य फेरीत प्रवेश केलेल्या भारतीय महिला हॉकी संघावर अर्जेंटिनाच्या महिलांनी २-१ ने मात केली. सामन्यात आघाडी घेतल्यानंतर भारतीय महिला नंतर गोल करण्यात अपयशी ठरल्या. दुसरीकडे अर्जेंटिनाने आपला सर्व अनुभव पाणाला लावत पिछाडी भरुन काढत आघाडी घेत अखेरपर्यंत ती कायम राखली. भारतीय महिलांनाही आता पुरुष संघाप्रमाणे कांस्यपदकासाठी खेळावं लागणार आहे.
ऑस्ट्रेलियावर मात करुन उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाकडून तमाम क्रीडाप्रेमींना खूप अपेक्षा होत्या. भारतीय महिलांनीही या अपेक्षांना साजेसा खेळ करत दुसऱ्याच मिनीटाला सामन्यात आघाडी घेतली. ड्रॅगफ्लिकर गुरजीत कौरने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. पहिल्या सत्रात भारतीय महिलांनी अर्जेंटिनाला दडपणाखाली आणत सामन्यावर आपलं वर्चस्व राखलं. भारतीय बचावपटूंनीही अर्जेंटिनाचं आक्रमण परतावून लावत आपली आघाडी कायम राहिली.
परंतू ही आघाडी कायम राखणं भारतीय महिलांना जमलं नाही. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच अर्जेंटिनाच्या महिलांनी सामन्यात बरोबरी साधली. १८ व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नरवर अर्जेंटिनाची कॅप्टन मारीया नोएल बारीओन्युवोने गोल करत अर्जेंटिनाला बरोबरी साधून दिली. यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी आक्रमणाची धार वाढवत भारतीय महिलांना दडपणाखाली आणलं. परंतू भारतीय बचावपटूंनी भारतीय गोलपोस्ट सुरक्षीत ठेवला. अखेरीस कर्णधार राणी रामपाल, वंदना कटारिया यांनी बॉलवर ताबा मिळवण्यात यश मिळवलं. दुसरं सत्र संपत असताना भारताला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याच्या दोन संधी आल्या होत्या. परंतू या संधी वाया गेल्या. यानंतर अर्जेंटिनानेही सामन्यात आघाडी घेण्याचे प्रयत्न केले परंतू ते देखील फोल ठरले.
तिसऱ्या सत्रातही दोन्ही संघ तोडीस तोड खेळ करत होते. दोन्ही संघाच्या बचावफळीतल्या खेळाडूंनी आपापले गोलपोस्ट सुरक्षित ठेवले होते. अखेरीस अर्जेंटिनाने पुन्हा एकदा गोलपोस्टवरची कोंडी फोडत सामन्यात आघाडी घेतली. कर्णधार मारीया नोएल बारीओन्युवोने ३६ व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नरवर भारताचा बचाव भेदत गोल केला. या गोलसह अर्जेंटिनाने सामन्यात २-१ ने आघाडी घेत भारतीय महिलांना बॅकफूटला ढकललं. दरम्यानच्या काळात भारतीय महिलांकडेही गोल करण्याच्या संधी येत होत्या. परंतू उतावळेपणा करत भारतीय महिलांनी त्या वाया घालवल्या. तिसऱ्या सत्राअखेरीस अर्जेंटिनाचा संघ सामन्यात २-१ अशा फरकाने आघाडीवर होता.










