पुणे हादरलं, ओढणीने गळा आवळून विवाहितेचा खून; नेमकं काय घडलं?

Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील आर्वी गावात पती-पत्नीच्या वादातून 25 वर्षीय विवाहितेची ओढणीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Pune Crime News

Pune Crime News

मुंबई तक

• 07:33 AM • 20 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुणे हादरलं, ओढणीने गळा आवळून विवाहितेचा खून

point

नेमकं काय घडलं?

Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील आर्वी गावात एका 25 वर्षीय विवाहितेची ओढणीने गळा आवळून निर्घृण हत्या करण्यात आल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. रुतुजा अक्षय तावरे असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी तिचा पती अक्षय रामदास तावरे याच्या विरोधात राजगड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नानंतरच्या अवघ्या काही महिन्यांतच पती-पत्नीमध्ये घरगुती वादाला सुरुवात झाली होती, ज्याचे रूपांतर अखेर या भीषण हत्याकांडात झाले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : 'मला बायकोपासून वाचवा', त्रासलेल्या पतीने व्याकूळ होऊन काय सांगितलं?

लग्नाच्या सहा महिन्यांनंतरच वाद विकोपाला

रुतुजा आणि अक्षय यांचा विवाह 16 मे 2023 रोजी झाला होता, परंतु लग्नाच्या सहा महिन्यांनंतरच त्यांच्यातील वाद विकोपाला गेले. अक्षयकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून रुतुजा सुमारे सहा महिन्यांपूर्वी आपल्या माहेरी पणदरे येथे निघून गेली होती. या वादावर तोडगा काढण्यासाठी बारामती महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती, जिथे दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत तडजोड होऊन ती पुन्हा पतीसोबत राहण्यास गेली होती. मात्र, काही काळाने पुन्हा भांडणे सुरू झाल्याने एप्रिल 2026 मध्ये ती पुन्हा माहेरी आली होती. 4 मे 2026 रोजी भावाने तिला सासवड येथे सोडले असता, आरोपी अक्षयने तिला आर्वीला नेले आणि तिथेच हा दुर्दैवी प्रकार घडला.

हेही वाचा : ‘किमान आदित्य ठाकरेंनी तरी...’, फुटलेले ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?

ओढणीच्या सहाय्याने रुतुजाचा गळा आवळून खून

मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास रुतुजाचे मामा बजरंग काशिद यांना तिच्या मृत्यूची बातमी मिळाली. राजगड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ही माहिती नातेवाईकांना दिल्यावर त्यांना मोठा धक्का बसला. अक्षयने घरातील वादाच्या कारणावरून ओढणीच्या सहाय्याने रुतुजाचा गळा आवळून तिची हत्या केली, असे तपासात निष्पन्न झाले आहे. तिला तातडीने श्लोक हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच रुतुजाच्या भावाने, अनिकेत पवार यांनी खेड-शिवापूर पोलीस चौकीत जाऊन अक्षय तावरे याच्या विरोधात लेखी तक्रार दिली.

राजगड पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 103 आणि 85 अन्वये आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला आहे. या भीषण कृत्यानंतर आरोपी अक्षय तावरे हा फरार झाला असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. रुतुजाच्या मृत्यूने तिच्या माहेरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात संतापाची लाट पसरली आहे. वारंवार होणाऱ्या घरगुती हिंसाचाराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे एका निष्पाप तरुणीला आपला जीव गमवावा लागला, अशी भावना व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून लवकरच आरोपीला जेरबंद केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.