Pune News : पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर गुरुवारी सकाळी एका हृदयद्रावक दुर्घटनेत 26 वर्षीय तरुण बिझनेसमन केतन विशाल अग्रवाल यांचा 350 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला आहे. केतन हे आपल्या कुटुंबीयांसोबत आणि मित्रांसोबत लोहगड किल्ल्याला भेट देण्यासाठी गेले होते. किल्ल्याच्या विविध भागांची पाहणी करत असताना, अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते थेट दरीत कोसळले. त्यांना सावरण्याची कोणतीही संधी मिळाली नाही आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस, शिवदुर्ग मित्र आणि मावळ वन्यजीव रक्षक संस्थेच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दुर्गम भाग आणि पावसाळी वातावरणामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मोठ्या अडचणी आल्या, तरीही प्रयत्नांची पराकाष्ठा करत केतन यांचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मुंबईची खबर : BEST कर्मचाऱ्यांचा संप, मुंबईकरांचे हाल! काय आहेत मागण्या?
केतन यांच्या निधनाने अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर
केतन अग्रवाल हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचे सुपुत्र होते. केतन यांच्या निधनाने अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. केतन यांच्या आयुष्यातील आनंदाचे अनेक महत्त्वाचे टप्पे अगदी जवळ आले होते. येत्या 19 जून रोजी त्यांच्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस होता, ज्यासाठी त्यांनी महाबळेश्वरमध्ये खास सेलिब्रेशनचे नियोजन केले होते. या वाढदिवसाच्या उत्साहापाठोपाठ पुढच्याच महिन्यात जयपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहळा होणार होता. यासाठी जयपूरमधील एक भव्य राजवाडा बुक करण्यात आला होता आणि पाहुण्यांच्या सोयीसाठी विशेष दोन विमानांचीही व्यवस्था करण्यात आली होती.
हेही वाचा : ठाकरेंची साथ सोडल्यानंतर संजय जाधवांची पहिली पोस्ट, फेसबुकचं कमेंट सेक्शन बंद
ज्या घरात लग्नाची तयारी आणि आनंदाची लगबग सुरू होती, तिथे आता केवळ शोककळा पसरली आहे. केतन यांच्या अकाली निधनामुळे नातेवाईक, मित्र आणि व्यावसायिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. लोहगड हे ठिकाण पुणे आणि मुंबईतील पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय असून, पावसाळ्यात येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र, या दुर्घटनेने पुन्हा एकदा पर्यटकांच्या सुरक्षेचा आणि डोंगराळ भागात फिरताना घ्यायच्या काळजीचा प्रश्न गंभीरपणे समोर आणला आहे. निसर्गाच्या सानिध्यात फिरताना होणारी छोटीशी चूक किती महाग पडू शकते, याचे हे एक अत्यंत वेदनादायी उदाहरण ठरले आहे.
या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस संपूर्ण घटनेचा अधिक तपास करत आहेत. प्रशासनाकडून अशा प्रकारच्या पर्यटन स्थळांवर सुरक्षेच्या उपाययोजना वाढवण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. केतन अग्रवाल यांच्यासारख्या तरुण आणि भविष्यात मोठी स्वप्ने पाहणाऱ्या उद्योजकाचा अशा प्रकारे झालेला अंत सर्वांच्या मनाला चटका लावणारा आहे.
ADVERTISEMENT











