Barshi Crime : बार्शी तालुक्यातील श्रीपतपिंपरी येथे मुलीला मोबाइलवर मेसेज पाठवल्याच्या वादातून सहा जणांनी एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. 4 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे 9:30 वाजता ही थरारक घटना घडली. जखमी तरुण दोन दिवस बेशुद्धावस्थेत उपचार घेत होता. शुद्धीवर आल्यानंतरच संपूर्ण प्रकरण बाहेर आले.
ADVERTISEMENT
फिर्यादी उस्मान रुस्तुम पठाण (वय 56, रा. कुसळंब) यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा मुलगा राजू उस्मान पठाण याने एका मुलीला काही मेसेज पाठवले होते. या गोष्टीवरून सुरू झालेला वाद मिटवण्यासाठी आणि माफी मागण्यासाठी त्यांनी 4 नोव्हेंबर रोजी रात्री मुलगा राजू आणि पुतण्या अस्लम पठाण यांना घेऊन संबंधित व्यक्तींकडे भेट दिली. त्यांनी शांततेत हा वाद मिटेल, असे गृहीत धरले होते.
‘तुला खूप माज आला आहे’, म्हणत तरुणावर तलवारीने हल्ला
मात्र, प्रत्यक्ष ठिकाणी पोहोचताच वातावरण बदलले. आरोपींनी ‘तुला खूप माज आला आहे’ असे म्हणत राजूवर शिवीगाळ आणि धमक्यांचा भडिमार सुरू केला. बोलण्याआधीच त्याच्यावर तलवारीसह अचानक हल्ला करण्यात आला. हल्ला इतका जोरदार होता की राजू जागीच कोसळून बेशुद्ध झाला. राजूला वाचवण्यासाठी वडील उस्मान पठाण यांनी मध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपींनी त्यांनाही मारहाण करून जखमी केले. गंभीर जखमी अवस्थेत राजूला तातडीने बार्शीतील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे तो तब्बल दोन दिवस बेशुद्ध राहिला.
हेही वाचा : सीबीआयचे तपास अधिकारी बोगस, सेवेत राहण्यायोग्य देखील नाहीत, सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं
पीडित शुद्धीवर आल्यानंतर घडलेली संपूर्ण माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर उस्मान पठाण यांनी सहा जणांविरुद्ध बार्शी तालुका पोलिस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली आहे. आरोपींनी पूर्वनियोजितरीत्या समेटाच्या बहाण्याने बोलावून प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण, आरोपींची नावे आणि पळून गेलेले संशयित यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे श्रीपतपिंपरी परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











