एजाज खान, मुंबई: मुंबईची 'लाइफलाइन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोकल ट्रेनसमोर आपल्या पत्नीला मृत्यूच्या दारी पोहचविणाऱ्या एका विक्षिप्त पतीला रेल्वे पोलिसांनी केवळ 20 तासांच्या आत जेरबंद केले. आरोपी राजू अवधराम गुप्ता (वय 42 वर्ष) याने मुलुंड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वर पत्नी पुष्पा गुप्ता हिला थेट समोरून येणाऱ्या लोकल ट्रेनसमोर ढकलले. या घटनेत पुष्पा हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
काय आहे संपूर्ण प्रकरण?
फिर्यादी कमलेशकुमार गुप्ता हा आपली बहीण पुष्पा आणि भाच्यासोबत उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातून मुंबईला येऊन राहिला होता. 14 मार्च 2026 रोजी पुष्पा आणि तिचा पती राजू गुप्ता यांच्यात घरगुती कारणावरून भांडण झाले होते. भांडण इतके चिघळले की, दोघेही तक्रार नोंदवण्यासाठी मुलुंड पोलीस स्टेशनला गेले.
हे ही वाचा>> दहावीची परीक्षा सुरु असताना शिक्षकाने सात विद्यार्थीनींशी केले अश्लील कृत्य, परीक्षेदरम्यान परिसरात गदारोळ
पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर कमलेशकुमार आपला विसरलेलं पाकिट घेण्यासाठी घरी गेला. याच वेळी राजू गुप्ता याने भयंकर कृत्य केले. मुलुंड स्टेशनवर जशी लोकल ट्रेन प्लॅटफॉर्मवर येत असल्याचं दिसून आलं, तेव्हा राजूने पत्नी पुष्पा हिला धक्का मारून थेट रुळावर ढकललं. यामध्ये पुष्पा यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी पती राजूने घटनास्थळावरून पळ काढला.
150 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले अन् आरोपीच्या मुसक्या आवळल्या
या धक्कादायक घटनेनंतर रेल्वे पोलिसांच्या क्राईम ब्रँच (STF), ठाणे, दादर आणि वडाळा युनिट्सनी विशेष तपास पथके स्थापन केली. तपासादरम्यान पोलिसांना आढळले की, आरोपीने गुन्ह्यानंतर आपला मोबाइल फोन बंद केला होता.
हे ही वाचा>> पतीने मित्रांना पार्टीसाठी घरी बोलावले, अन् नंतर त्याच्याच पत्नीवर चौघांकडून...
दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना समजले की, राजू मुलुंडहून ठाणे स्टेशनला पळाला, तेथून फास्ट लोकलने दादरला पोहोचला आणि दादरहून पश्चिम रेल्वेच्या ट्रेनने विरारच्या दिशेने निघाला. तंत्रज्ञान पथकाने विरार, पालघर आणि आसपासच्या सुमारे 150 सीसीटीव्ही फुटेज तपासले. यातून स्पष्ट झाले की, आरोपी गुजरातला जाणाऱ्या एका ट्रेनमध्ये चढला आहे.
सुरत येथून 20 तासांत अटक
ज्यानंतर मुंबई रेल्वे पोलिसांनी तात्काळ एक विशेष पथक गुजरातला रवाना केले. सुरतच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने पोलिसांनी जाळे पसरले. मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरातून आरोपी राजू अवधराम गुप्ता याला शिताफीने अटक केले.
पोलिसांच्या चौकशीत राजू गुप्ता याने गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की, “घरगुती कलह आणि सतत होणाऱ्या भांडणांमुळे मी पत्नीची हत्या केली.”
पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT











