नाशिक: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरासाठी अत्यंत गंभीर इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक जिल्ह्यात उद्या (7 जुलै) ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याची माहिती दिली आहे. हवामानाचा अंदाज लक्षात घेता एकाच दिवसात 300 ते 350 मिमीपर्यंत पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, प्रशासनाला युद्धपातळीवर तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, विशेषतः नाशिक ग्रामीण आणि त्र्यंबकेश्वर परिसरात पहाटेपासूनच अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य पूर, दरड कोसळणे आणि नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होण्याचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
धोकादायक ठिकाणांवरील नागरिकांचे स्थलांतर
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, ज्या भागांमध्ये पूर किंवा ढगफुटीचा धोका अधिक आहे, त्या ठिकाणांवरील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. स्थानिक प्रशासन, महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि ग्रामपंचायत स्तरावर आवश्यक तयारी करण्यात आली आहे.
हे ही वाचा>> BMC कडून मोठा अलर्ट जारी.. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनाही सोडलं घरी, आता 80 ते 90 किमी वेगाने वाहणार वारे!
पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क
परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस विभाग, जिल्हा प्रशासन, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), अग्निशमन दल आणि आरोग्य यंत्रणा यांना पूर्ण सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आवश्यक यंत्रसामग्री, बचाव पथके आणि आपत्कालीन सेवा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा>> अल-निनो असतानाही एवढा पाऊस का पडतोय? महाराष्ट्रात अचानक पावसाचा कहर
नागरिकांसाठी प्रशासनाच्या महत्त्वाच्या सूचना
- नदी, ओढे, धरणे आणि धबधब्यांजवळ जाणे टाळा.
- अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका.
- प्रशासनाने स्थलांतराचे आदेश दिल्यास तात्काळ सहकार्य करा.
- हवामान विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवा.
- पूरग्रस्त किंवा पाणी साचलेल्या रस्त्यांवरून प्रवास टाळा.
- मोबाईल चार्ज ठेवावा आणि आवश्यक कागदपत्रे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.
ढगफुटी म्हणजे काय?
ढगफुटी (Cloudburst) म्हणजे अतिशय कमी वेळेत अत्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडणे. अशा परिस्थितीत काही तासांतच नद्या-नाले तुडुंब भरतात, अचानक पूर येतो आणि दरडी कोसळण्याचा धोका वाढतो. डोंगराळ आणि घाट परिसरात याचा सर्वाधिक परिणाम जाणवतो.
प्रशासनाची तयारी
नाशिक जिल्हा प्रशासनाने नियंत्रण कक्ष सक्रिय केला असून संवेदनशील गावांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. जलसंपदा विभाग, वीज वितरण कंपनी, आरोग्य विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समन्वय ठेवून परिस्थितीवर सतत नजर ठेवली जात आहे.
ADVERTISEMENT












