Mumbai school refused to sit in class because of mehndi on hands of student : चेंबूरमधील सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूलमध्ये हातावर मेहंदी लावल्यामुळे काही विद्यार्थिनींना वर्गात प्रवेश नाकारल्याच्या तक्रारीमुळे पालक आणि शिक्षण विभागात चांगलाच गदारोळ माजला आहे. या प्रकरणाची दखल घेत उपशिक्षणाधिकाऱ्यांनी सोमवारी शाळेला भेट देऊन चौकशी केली. तसेच शिक्षण निरीक्षक डॉ. मुश्ताक शेख यांनी शाळेला लेखी खुलासा मागवणारी नोटीस बजावल्याचे समोर आले आहे.
ADVERTISEMENT
पालकांनी केलेल्या तक्रारीनुसार, दोन दिवसांपूर्वी सुमारे 15 ते 20 विद्यार्थिनींना हातावर मेहंदी असल्याच्या कारणावरून वर्गाबाहेर उभे करण्यात आले. याविषयी पालकांनी मनसेच्या चेंबूरमधील नेत्यांकडे याबाबतची तक्रार सांगितली . त्यानंतर मनसेचे सरचिटणीस कर्ण दुनबळे यांनी स्वतः शाळेत जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. काही पालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मुलींना मेहंदी काढेपर्यंत वर्गात प्रवेश नाकारण्यात आला होता. मात्र मनसेच्या हस्तक्षेपानंतर त्यांना वर्गात बसण्याची परवानगी देण्यात आली.
हेही वाचा : 'मराठी माझी आई आणि उत्तर भारत माझी मावशी, आई मेली तरी चालेल पण...', शिंदेंच्या मराठी आमदारने उडवली खळबळ
या घटनेवर प्रतिक्रिया देताना मनसे सरचिटणीस कर्ण दुनबळे म्हणाले, “शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या सांस्कृतिक ओळखीवरून भेदभाव करण्याचा अधिकार कोणालाही नाही. राज्यघटनेने प्रत्येकाला शिक्षणाचा समान अधिकार दिला आहे. आमच्या हस्तक्षेपानंतर विद्यार्थिनींना वर्गात बसवण्यात आले. मात्र पुढील काळात असाच प्रकार घडल्यास मनसेच्या स्टाईल आंदोलन केले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, शिक्षण निरीक्षक डॉ. मुश्ताक शेख यांनी सांगितले की, “हातावर मेहंदी लावल्यामुळे विद्यार्थिनींना वर्गात प्रवेश न देणे ही कृती पूर्णपणे नियमबाह्य आहे. त्यामुळे शाळेने या प्रकरणावर लेखी स्पष्टीकरण सादर करावे, अशी नोटीस आम्ही शाळेला दिली आहे. मंगळवारी शिक्षणाधिकारी कार्यालयात शाळेने खुलासा करणे आवश्यक आहे.”
शाळेने स्पष्टीकरण देताना काय सांगितलं?
शाळेच्या बाजूने मात्र वेगळी भूमिका मांडण्यात आली आहे. सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूलच्या प्राचार्या ओलिंडा फ्रान्सिस यांनी सांगितले, “शाळेत असा कोणताही प्रकार घडलेला नाही. विद्यार्थिनींना फक्त शाळेच्या शिस्तीचे आणि पीटीएने ठरवलेल्या नियमांचे पालन करण्यास सांगितले होते. आम्हाला शिक्षण विभागाची कोणतीही नोटीस अद्याप मिळालेली नाही.” या प्रकरणामुळे पालक, विद्यार्थी आणि शाळा प्रशासन यांच्यात तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra Weather : नोव्हेंबर महिन्यात थंडी गायब, 'इथे' पडणार पाऊस.. तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
ADVERTISEMENT











