पुणे लोकसभा : राष्ट्रवादीला हवाय काँग्रेसचा मतदारसंघ, संजय राऊतांनी सुनावलं

मुंबई तक

29 May 2023 (अपडेटेड: 29 May 2023, 06:40 AM)

पुणे लोकसभा पोटनिवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मविआतील दोन पक्ष आमने-सामने का आलेत आणि खासदार संजय राऊतांनी राष्ट्रवादीला काय सुनावलं, हेच समजून घेऊयात…

pune lok sabha bypoll 2023 : sanjay raut tweet after NCP leader ajit pawar and nana patole statement

pune lok sabha bypoll 2023 : sanjay raut tweet after NCP leader ajit pawar and nana patole statement

follow google news

“प्रशांत जगताप यांना खासदार होण्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा. पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार घटक पक्ष एकत्र बसून ठरवू. पण, नवा चेहरा दिल्यास जनताही त्याला पसंत करते”, हे विधान आहे राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं. एप्रिल 2023 मध्ये अजित पवारांनी हे विधान केलं आणि त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली. पुणे लोकसभा पोटनिवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मविआतील दोन पक्ष आमने-सामने का आलेत आणि खासदार संजय राऊतांनी राष्ट्रवादीला काय सुनावलं, हेच समजून घेऊयात…

हे वाचलं का?

स्व. गिरीश बापट यांचं निधन झालं. बापट पुण्याचे खासदार होते, त्यामुळे ही जागा रिक्त झाली. त्यानंतर पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून या जागेवर दावा केला गेला. याची सुरूवात झाली, प्रशांत जगताप यांच्याकडून. प्रशांत जगताप यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर अजित पवार यांनी ‘प्रशांत जगताप यांना खासदार होण्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा’, म्हणत शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे लोकसभा मतदारसंघावर दावा केल्यानंतर काँग्रेसकडून बारामती लोकसभा मतदारसंघांवर दावा केला गेला. काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पवार यांनी ही मागणी केली. तेव्हापासून दोन्ही पक्षात रस्खीखेच सुरू झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसला का हवाय काँग्रेसचा मतदारसंघ?

पुणे लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलताना अजित पवार असं म्हणाले की, “पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद काँग्रेसपेक्षा जास्त आहे. कुणाचे आमदार जास्त आहेत, ते पाहिले पाहिजे. तसेच काँग्रेसला पडलेली मतेही विचारात घ्यावी लागणार आहेत. एखाद्या मतदारसंघात जागा निवडून येण्याची शक्यता कमी असेल आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षाची ताकद तिथे जास्त असेल, तर ती जागा मित्र पक्षाला दिली गेली पाहिजे.”

हेही वाचा >> Mangesh Chavan : “एकनाथ खडसे म्हणजे विकृती, राष्ट्रवादी काँग्रेससाठी पनवती”

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील नेते जागावाटपावरून वेगवेगळ्या भूमिका मांडत आहे. 2024 च्या दृष्टीने तिन्ही पक्षही जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जात आहे. जागावाटपाचं सुत्र लवकरात लवकर निश्चित व्हावं, त्यासाठीच राष्ट्रवादीकडून पुणे लोकसभा मतदारसंघावर दावा सांगून त्याची सुरूवात करण्यात आली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

काँग्रेसची भूमिका काय?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या पुणे लोकसभा मतदारसंघाबद्दल म्हणाले की, “पुण्यातील विधानसभा निवडणुकीत आम्ही आमच्या जागा अतिशय कमी फरकाने हरलो. आमच्या तुलनेत राष्ट्रवादीने हरलेल्या जागांमधील मतांचा फरक अधिक होता. लोकसभा मतदारसंघानुसार पुण्यात राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे. त्यामुळे पुण्याच्या लोकसभेचा निर्णय गुणवत्तेवरच होईल. 2-3 जून रजी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत यावरच चर्चा करू.”

संजय राऊतांचा सल्ला राष्ट्रवादी-काँग्रेस स्वीकारणार का?

पुणे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीमध्येही काँग्रेसच राहिलेला आहे. आधीपासून काँग्रेसकडे असलेल्या मतदारसंघावर अचानक राष्ट्रवादीने दावा केल्यानंतर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे सुनावलं आहे.

हेही वाचा >> बच्चू कडू-राणा दाम्पत्यात संघर्ष पेटला, लोकसभेच्या जागेवरून दावे प्रतिदावे

संजय राऊतांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “कसेल त्याची जमीन याप्रमाणे… जो जिंकेल त्याची जागा, हे सूत्र ठरले तर ‘कसबा’प्रमाणे पुणे ‘लोकसभा’ पोटनिवडणूक महाविकास आघाडीस सहज जिंकता येईल. जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट अनाठायी आहे. जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल! जय महाराष्ट्र!”, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

ही भूमिका मांडताना संजय राऊत यांनी हे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना टॅग केलं आहे. राऊतांनी त्याग करण्याचा सल्ला दोन्ही मित्रपक्षांनादिला आहे, पण त्याचा विचार काँग्रेस-राष्ट्रवादी करणार का? हे आगामी काळात दिसून येईल.

    follow whatsapp