प्रविण नलावडे, भाईंदर: भाईंदरमध्ये शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत असलेल्या 89 वर्षीय वृद्ध महिलेला उंदराने कुरतडल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. या प्रकरणी वृद्ध महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले असून रुग्णालय प्रशासनावर कारवाईची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
भाईंदर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एका वृद्ध महिलेला उंदराने चावा घेतल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सुहासिनी माठेकर (वय 89) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांना 12 मार्च रोजी भाईंदर पश्चिम येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
हे ही वाचा>> पुणे - कुख्यात गुंड निलेश घायवाळला कानशिलात लगावणाऱ्या पैलवानाचा पुण्यात मृत्यू, एका आरोपीच्या आवळल्या मुसक्या
त्यांच्या प्रकृतीची स्थिती गंभीर असल्याने त्यांच्यावर चौथ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते. नातेवाईकांच्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास आयसीयूमध्ये उंदराने त्यांच्या हाताला कुरतडल्याची घटना घडली. सोमवारी सकाळी सुमारे सहा वाजता नातेवाईक त्यांना पाहण्यासाठी आयसीयूमध्ये गेले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यावेळी महिलेच्या उजव्या हाताला गंभीर जखम झालेली होती आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. उंदीर तिथून पळून गेल्याचेही नातेवाईकांनी सांगितले.
हे ही वाचा>> मुलाला अॅक्टर आणि आईला राज्यपाल बनवतो, बड्या नेत्याशी जवळीक असल्याचे भासवून मोठं कांड
जखमेमुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने दुपारपर्यंत महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर किंवा परिचारिकांच्या लक्षात हा प्रकार कसा आला नाही? असा सवालही नातेवाईकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
या घटनेमुळे रुग्णालयातील स्वच्छता व रुग्णांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी रुग्णालयाचे व्यवस्थापक जाफर तडवी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. या घटनेत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जबाबदारांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT











