Crime News jhansi : झाशीजवळील बबीना कँट परिसरातील एका स्मशानभूमीत रात्री पोलिसांचा कडक पहारा पाहायला मिळाला. स्मशानभूमीत अर्धवट जळालेली चिता होती, तर त्याच्या जवळ लाल कपड्यात गुंडाळलेला मृतदेह ठेवण्यात आला होता. आजूबाजूला लाकडं विखुरलेली होती आणि पोलीस त्या मृतदेहाभोवती पहारा देत होते. या प्रकारामुळे स्मशानभूमीत येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांमध्येही कुतूहल निर्माण झालं होतं. हा मृतदेह राधा राठौर हिचा होता. विशेष म्हणजे, तिचा पती सागर साहू याचवेळी रुग्णालयात जीवन-मृत्यूशी झुंज देत होता. 32 वर्षीय सागर मध्य प्रदेशातील अशोकनगरमध्ये एसी आणि फ्रिज दुरुस्तीचं काम करतो. त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : शिंदेंवर नाही तसली टीका, प्रेसनंतर लगेच जरांगेंना फोन, जे जे बोलले ते सगळं ऐका!
सागरने विष प्राशन केलं अन् दुसरीकडे पत्नीचं टोकाचं पाऊल
सागर आणि राधाचं लग्न होऊन अवघे नऊ महिने झाले होते. 2025 च्या सुरुवातीला सोशल मीडियावर दोघांची ओळख झाली होती. लखनौची रहिवासी असलेली राधा सोशल मीडियावर रील्स बनवत असे आणि इन्स्टाग्रामवर सक्रिय होती. याच माध्यमातून तिची झाशीतील सागरशी ओळख झाली. पुढे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. मात्र दोघांच्या आग्रहामुळे कुटुंबीय तयार झाले आणि 25 नोव्हेंबर 2025 रोजी दोघांचं लग्न झालं. लग्नानंतर दोघे मध्य प्रदेशातील अशोकनगरमध्ये राहू लागले. मात्र सोमवार, 3 ऑगस्टच्या रात्री सागर पत्नी राधासोबत बबीना येथील घरी पोहोचला. त्यानंतर दोघांमध्ये नेमकं काय घडलं हे स्पष्ट नसताना सागरने विष प्राशन केलं. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं आणि त्यानंतर झाशी मेडिकल कॉलेजमध्ये हलवलं.
हेही वाचा : पुण्यात आल्यानंतर पहिल्या बॉयफ्रेंडला विसरली, एका प्रियकराने केला दुसऱ्याचा मर्डर
स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न
सागरला रुग्णालयात नेल्यानंतर घरातून पुन्हा एक धक्कादायक फोन आला. घरात असलेल्या राधाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. कुटुंबीयांनी तिला खाली उतरवून रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. त्यामुळे अशोकनगरहून बबीना आल्यानंतर सागर आणि राधामध्ये नेमकं काय घडलं, ज्यामुळे दोघांनीही इतकं टोकाचं पाऊल उचललं, हा प्रश्न निर्माण झाला. त्यातच राधाच्या सासरच्या मंडळींनी रात्री तिचा मृतदेह बबीना कँटमधील स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र राधाच्या माहेरच्या मंडळींना तिच्या मृत्यूची माहिती देण्यात आली नव्हती. बबीना येथून कोणीतरी फोन करून राधाच्या लखनऊमधील कुटुंबीयांना तिच्या मृत्यूची माहिती दिली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्काराची तयारी सुरू असल्याचं समजलं.
राधाच्या कुटुंबीयांना मुलीच्या मृत्यूची माहिती न देता तिचा मृतदेह रात्रीच स्मशानभूमीत नेण्यात आल्याने या मृत्यूचं गूढ अधिकच वाढलं. राधाच्या माहेरच्या मंडळींनी आपण येईपर्यंत अंत्यसंस्कार करू नयेत, अशी विनंती समाजातील लोकांना केली. मात्र तोपर्यंत मृतदेह स्मशानभूमीत आणण्यात आला होता आणि अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली होती. याच कारणामुळे या अस्वाभाविक मृत्यूच्या प्रकरणात आता हत्येच्या शक्यतेची चर्चाही सुरू झाली. त्यामुळे पोलिसांनी स्मशानभूमीत राधाच्या मृतदेहाभोवती पहारा ठेवला. एका बाजूला राधाचा मृतदेह स्मशानभूमीत होता, तर दुसऱ्या बाजूला तिचा पती सागर रुग्णालयात गंभीर अवस्थेत होता. अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या या दाम्पत्याच्या आयुष्यात अचानक घडलेल्या या घटनांमुळे मृत्यूमागचं नेमकं कारण काय, हा प्रश्न कायम आहे.
ADVERTISEMENT












