Crime News : एका 18 वर्षीय विद्यार्थ्याची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केतन लाल असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो 12 वीच्या वर्गात शिकत होता. केतनची एका मुलीशी गेल्या सहा महिन्यांपासून मैत्री होती, जी मुलीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हती. याच रागातून मुलीच्या वडिलांनी आणि आजोबांनी केतन आणि त्याच्या मित्राला रविवारी रात्री घरी बोलावून त्यांना ओलीस ठेवले आणि रात्रभर अमानुष मारहाण केली. जातीय अहंकारामुळे हा प्रकार घडलाय. या मारहाणीत केतनच्या पायांत खिळे ठोकल्याचा गंभीर आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे, ज्यामुळे या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : भाजपशी लढायचे असेल तर विरोधी पक्षांकडे आता हा 'एकच' पर्याय
उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला
केतनचे वडील, जे व्यवसायाने शेतकरी आहेत, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी मुलीच्या वडिलांनी, यशबीर सिंग पवार याने त्यांना फोन करून धमकीच्या सुरात केतनबद्दल विचारणा केली. केतन घरी नसल्याचे समजताच यशबीरने केतन आणि त्याच्या मित्राची हत्या केल्याची कबुली दिली. केतनचे वडील तात्काळ यशबीरच्या गावी पोहोचले, तिथे त्यांना केतन आणि त्याचा मित्र दिवाकर अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत आढळले. केतनला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मरण पावण्यापूर्वी केतनने आपल्या वडिलांना मुलीनेच आपल्याला घरी बोलावले होते आणि तिथे गेल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी आम्हाला डांबून मारहाण केल्याचे सांगितले.
हेही वाचा : ढीगभर पगार असूनही पैसा पुरेना! सांगलीतील अधिकाऱ्याने काय केले?
मुलीच्या घरच्यांना केतनशी मैत्री अजिबात नव्हती
या अमानुष घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुलीचे वडील यशबीर सिंग पवार आणि आजोबा विद्यादत्त पवार यांना अटक केली आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि एससी/एसटी (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवाकर याच्यावर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली आहे. टिहरी गढवालच्या एसपी श्वेता चौबे यांनी सांगितले की, मुलीच्या घरच्यांना केतनशी असलेली तिची मैत्री अजिबात आवडत नव्हती. याआधीही त्यांनी केतनच्या वडिलांना आपल्या मुलीशी संपर्क न ठेवण्यास सांगितले होते, मात्र तरीही मुलीने केतनला घरी बोलावले आणि यातून हा भयानक प्रकार घडला. उत्तराखंडमधील टिहरी गढवाल जिल्ह्यातील लंबगाव भागात ही घटना घडली.
या घटनेमुळे टिहरी गढवाल परिसरात दहशतीचे आणि दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील माजी सरपंचांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून, मुलीच्या कुटुंबीयांना कायदा हातात घेण्याचा कोणताही अधिकार नव्हता, असे म्हटले आहे. मुलांची चूक असेल तर त्यांनी पोलिसांकडे तक्रार करायला हवी होती, परंतु त्यांनी छळ करून एका 18 वर्षांच्या तरुणाचा जीव घेतला, ही माणुसकीला काळीमा फासणारी बाब आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. या अहवालानंतर केतनच्या शरीरावर नक्की कोणत्या स्वरूपाच्या जखमा होत्या आणि मृत्यूचे नेमके कारण काय, हे स्पष्ट होईल. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
ADVERTISEMENT











