पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी येथील कोकणकडा परिसरात 1200 फूट खोल दरीत दोन मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये श्रीगोंद्याचे तलाठी रामचंद्र साहेबराव पारधी (वय 40) आणि महाविद्यालयीन तरुणी रूपाली संतोष खुटाण (आंबोली, ता. जुन्नर) यांचा समावेश आहे. प्राथमिक तपासात पोलिसांनी या दोघांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, दोघांनी टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
जुन्नर पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह दरीतून बाहेर काढण्यासाठी जुन्नर पोलिस आणि रेस्क्यू टीमने कठीण परिस्थितीत शोधकार्य हाती घेतले. दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे नोंदवली होती. रामचंद्र पारधी हे मूळचे दुर्गावाडी येथील रहिवासी असून, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून ते बेपत्ता होते, याबाबत त्यांच्या पत्नीने अहमदनगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दुसरीकडे, रूपाली खुटाण ही देखील काही दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्या अपहरणाचा गुन्हा जुन्नर पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला होता.
हे ही वाचा >> "लय घाण बोलेन...", म्हणत कानाखाली मारली, महिला पोलिसाची ट्रिपल सिट स्कुटी पळवणाऱ्या मुलींना शिवीगाळ
पांढरी गाडी आणि चपलांमुळे संशय
जुन्नर येथील रिव्हर्स वॉटर फॉलजवळ काही दिवसांपासून एक पांढऱ्या रंगाची कार उभी असल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आलं. यानंतर ग्रामस्थांनी शोधाशोध केली असता, दरीच्या कठड्याच्या टोकावर एक पुरुष आणि एका स्त्रीच्या चपला आढळून आल्या. रविवारी (22 जून 2025) दाट धुके, पाऊस आणि अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आलं होतं. सोमवारी (23 जून 2025) सकाळी रेस्क्यू टीमने दरीत उतरून सर्वत्र शोध घेतला, तेव्हा रामचंद्र आणि रूपाली यांचे मृतदेह आढळून आले. रेस्क्यू टीमने अत्यंत खडतर परिस्थितीत मृतदेह दरीतून बाहेर काढले.
जुन्नर रेस्क्यू टीमने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी श्री शिवछत्रपती ग्रामीण रुग्णालयात पाठवले. या ऑपरेशनदरम्यान रेस्क्यू टीमला दरीच्या खडतर परिस्थितीचा सामना करावा लागला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
आत्महत्येचा संशय, पोलिसांकडून तपास सुरू
हेही वाचा >>पोलीस सांगून गाडीत बसवत अपहरण, चाकू लावून 50 लाखांची बॅग घेतली आणि फेकून दिलं... हादरवून टाकणारी घटना
प्राथमिक तपासात पोलिसांनी या दोघांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र, दोघांनी असे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत कोणतीही ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही. रामचंद्र आणि रूपाली यांच्यातील संबंध, त्यांच्या बेपत्ता होण्यामागील कारणे आणि या घटनेचा नेमका तपशील याबाबत जुन्नर पोलिस सखोल तपास करत आहेत. दोघांच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवले जाणार असून, त्यांच्या वैयक्तिक आणि सामाजिक पार्श्वभूमीचा तपास केला जाणार आहे.
ADVERTISEMENT
