Crime News : मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका तरुणाने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा राग मनात धरून, मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या वृद्ध वडिलांचे अपहरण केले. नातेवाईकांनी केवळ वृद्धाला बेदम मारहाणच केली नाही, तर त्यांना बाटलीतून जबरदस्तीने मूत्र पाजल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या अमानवीय कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
ADVERTISEMENT
7 मार्च रोजी घडली थरारक घटना
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 7 मार्च रोजी घडली. रायसेन जिल्ह्यातील एका गावातील तरुण अल्पवयीन मुलीला घेऊन पळून गेला होता. या प्रकारामुळे संतप्त झालेले मुलीकडचे 10 ते 12 लोक दोन गाड्यांमधून वृद्धाच्या घरी पोहोचले. त्यांनी मुलाबाबत विचारणा केली असता, वृद्धाने आपल्याला काहीच माहित नसल्याचे सांगितले. यामुळे संतापलेल्या आरोपींनी घरातच वृद्धाला आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केली. त्यानंतर मुलीचा शोध घेण्याच्या बहाण्याने त्यांनी वृद्धाला जबरदस्तीने गाडीत बसवून राजगड जिल्ह्यातील एका गावात नेले.
हे ही वाचा : घरात आईची हत्या करुन मुंडकं केलं धडावेगळं.. त्याच्यासोबतच मुलीने जंगलात घालवली रात्र!
अमानवीय छळ आणि व्हिडिओ व्हायरल
राजगड येथे पोहोचल्यानंतरही मुलगा-मुलगी न सापडल्याने आरोपी अधिकच क्रूर झाले. त्यांनी वृद्धाला डांबून अमानुष मारहाण केली. मर्यादा ओलांडत आरोपींनी दारूच्या बाटलीत मूत्र भरून ते वृद्धाला पिण्यास भाग पाडले. इतकेच करून हे नराधम थांबले नाहीत, तर त्यांनी या संपूर्ण घृणास्पद प्रकाराचा व्हिडिओ चित्रीत केला. हा व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आला, ज्यामुळे ही घटना उजेडात आली.
हे ही वाचा : पत्नीचे फिट राहण्यासाठीचे प्रयत्न, पतीला आवडले नाहीत; शटरच्या हँडलला बनवलं शस्त्र, क्रूरपणे हत्या
पोलिसांची कारवाई आणि तपास
सुरुवातीला भीतीपोटी कुटुंब शांत होते, मात्र व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ दखल घेतली. रायसेन पोलिसांनी पीडित वृद्धाशी संपर्क साधून त्यांची तक्रार नोंदवून घेतली आहे. हा गुन्हा रायसेन आणि राजगड अशा दोन जिल्ह्यांच्या हद्दीत घडल्याने दोन्ही जिल्ह्यांचे पोलीस संयुक्तपणे तपास करत आहेत. आतापर्यंत दोन मुख्य आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेने कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
ADVERTISEMENT











