Crime News : उत्तर प्रदेशातील चंदौली आणि वाराणसी जिल्ह्यांत गेल्या 26 तासांपासून दहशतीचे दुसरे नाव बनलेला सायको किलर आणि माजी सैनिक गुरप्रीत सिंह याचा सोमवारी (11 मे) उशिरा रात्री पोलीस चकमकीत मृत्यू झाला. अवघ्या एका दिवसात तीन निष्पाप लोकांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या या नराधमाचा शेवट पोलीस कारवाईने झाला.
ADVERTISEMENT
26 तासात तिघांची हत्या
मूळचा अमृतसरचा रहिवासी असलेला 45 वर्षीय गुरप्रीत सिंह भारतीय सैन्यातून 2021 मध्ये निवृत्त झाला होता. तो दारूच्या आहारी गेल्याने त्याला बिहारमधील सुरक्षारक्षकाच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते, ज्याचा राग तो सर्वसामान्यांवर काढत होता. त्यानं हत्येची मालिका रविवारी सकाळी सात वाजता सुरू केली. त्याने पहिल्यांदा डीडीयू-ताडीघाट पॅसेंजरमध्ये एका प्रवाशाची, त्यानंतर रविवारी रात्री जम्मू-तवी एक्सप्रेसमध्ये दुसऱ्या प्रवाशाची आणि सोमवारी सकाळी एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वृद्ध महिलेची एकाच पद्धतीने (गोळी झाडून) हत्या केली.
हे ही वाचा : बीड : भोळसर मुलीवर चुलत भावाचा अत्याचार, बापाला अटक, डॉक्टरचा बीपी वाढला!
धाडसी रिक्षाचालक
सोमवारी सकाळी रुग्णालयात हत्या करून पळताना विनोद दुबे नावाच्या धाडसी रिक्षाचालकाने त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. पोलीस अधीक्षक आकाश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री जेव्हा पोलीस पथक पुराव्यांच्या संकलनासाठी गुरप्रीतला गुन्ह्याच्या ठिकाणी घेऊन गेले होते, तेव्हा त्याने एका पोलीस अधिकाऱ्याची पिस्तूल हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला शरण येण्याचे आवाहन केले, मात्र त्याने गोळीबार सुरूच ठेवला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात गुरप्रीत गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.
हे ही वाचा : बांगलादेशी तरुणी इन्स्टाग्रामवरील प्रेमाला शोधत थेट जळगावात, विना व्हिसा भारतात केली घुसखोरी
'मी माझ्या मनाचा राजा आहे'
चौकशीदरम्यान त्याने 'मी माझ्या मनाचा राजा आहे, दारू प्यायल्यावर जे मनात येईल ते करतो,' अशी धक्कादायक कबुली दिली होती. आरोपीचा ६ फूट उंच देह आणि हत्या करण्याची विशिष्ट पद्धत यावरून पोलिसांनी या तिन्ही घटनांचा संबंध जोडला होता. अखेर, तीन कुटुंबं उद्ध्वस्त करणाऱ्या या सायको किलरचा थरार 26 तासांनंतर कायमचा शांत झाला आहे.
ADVERTISEMENT











