सुनील राऊतांवर गंभीर आरोप! ठाकरे गटातील सुवर्णा कारंजे शिंदेंच्या सेनेत

मुंबई तक

• 07:20 AM • 15 Jun 2023

विक्रोळी कांजूरमार्ग प्रभाग क्रमांक 117 च्या माजी नगरसेविका सुवर्णा कारंजे यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांनी आमदार सुनील राऊत यांच्यावर आरोप केला.

BMC Former corporator suvarna karanje allegations on sunil raut, joined eknath shinde shiv sena

BMC Former corporator suvarna karanje allegations on sunil raut, joined eknath shinde shiv sena

follow google news

Suvarna Karanje : विक्रोळी कांजूरमार्ग प्रभाग क्रमांक 117 च्या माजी नगरसेविका सुवर्णा कारंजे यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र केला. खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत सुवर्णा कारंजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, कारंजे यांनी केलेल्या आरोपांना सुनील राऊत यांनीही प्रत्युत्तर दिलं. (Ex corporator Suvarna Karanje allegations on Sunil Raut)

हे वाचलं का?

सुवर्णा कारंजे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडला. त्यानंतर ठाण्यात शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांनी सुनील राऊत यांच्यामुळे ठाकरेंचा पक्ष सोडत असल्याचा आरोप केला.

सुवर्णा कारंजेंनी सुनील राऊतांवर कोणते आरोप केले?

माध्यमांशी बोलताना सुवर्णा कारंजे म्हणाल्या, “ज्या ज्या वेळी यांनी (सुनील राऊत) मानसिक वा इतर त्रास दिला. त्या प्रत्येक वेळी मी संजय राऊत यांच्याकडे तक्रार केलेली आहे. त्यांनाही माहितीये की, त्यांचा भाऊ मला किती सतावतोय. पण, कदाचित असल्यामुळे तेवढ्यापुरतं ते बोलत होते, पण सुनील राऊतांचा स्वभाव असा आहे की, कुणाचं ऐकायचं नाही.”

“सुनील राऊत अधिकाऱ्यांना शिवीगाळ करतात…”

“त्यांची अरेरावी. त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यावर लक्षात येईल की किती अरेरावीने ते सगळ्यांशी बोलतात. अधिकाऱ्यांना तर शिवीगाळ करतात. त्यांचं तर म्हणणं होतं की, मला तिकीट देऊ नये. तिकीट दिल्यावर मी निवडून येऊ नये म्हणून त्यांनी भरपूर प्रयत्न केले. त्यांनी आव्हान दिलं होतं की, ही बाई निवडून येणार नाही आणि आली तर राजीनामा देईन. पण, मी निवडून आल्यावर त्यांनी राजीनामा काही दिला नाही”, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा >> युतीतील संघर्षाची धग कायम! भाजपचा शिवसेनेवर पलटवार

“निवडून आल्यावर मी कामाचा सपाटा सुरू केला. माझी कामं लोकांच्या नजरेत असल्याने त्यांचा कुठेतरी इगो दुखावला जातो म्हणून ते माझा मानसिक छळ करत. माझ्या वार्डात कार्यक्रम असो वा कुणाचा पक्ष प्रवेश, ते मला बोलवत नव्हते. त्यांना मला संपवायचं होतं, कारण त्यांनी सगळे त्यांच्या बाजूचे पदाधिकारी नेमले होते. त्यांनी मला संपवण्यासाठी कटकारस्थान रचलं होतं. त्याला मी बळी पडले नाही”, असं त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सांगितलं.

“माझा मातोश्रीवर अजिबात राग नाही. त्यांना कंटाळून मी गेले नाही, तर सुनील राऊत या एका माणसामुळे मी पक्ष सोडलेला आहे. पक्ष सोडताना मला आनंद झालेला नाही. पक्षासाठी काम केले, पण या आमदाराला त्याची अजिबात जाणीव नाहीये”, असंही त्यांनी म्हटलं आहे.

एक कीड होती, ती गेली, सुनील राऊत काय बोलले?

सुवर्णा कारंजे यांनी केलेल्या आरोपावर सुनील राऊत म्हणाले, “काल मला कळलं की, कांजूरच्या शाखेत फटाकेबाजी झाली. आनंदोत्सव साजरा करण्यासाठी हजारो शिवसैनिक शाखेत जमा झाले होते. आनंदोत्सव साजरा करताहेत कारण एक कीड होती, ती कीड काल आमच्यातून निघून गेली. आरोप कधीच छोट्या माणसावर होत नाही. जो चांगलं काम करतो, त्याच्यावर होतात. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपाची मला त्याची चिंता नाही”, असं उत्तर सुनील राऊत यांनी दिले.”

हेही वाचा >> रायगडमध्ये भाजपचे बेरजेचं राजकारण! सुनील तटकरेंविरुद्ध पाटलांना ‘ताकद’?

“तीन-चार वर्षापासून त्यांचं कुणाशीच पटत नव्हते. मी सगळ्यांना सांभाळून घेण्याचा मनापासून प्रयत्न करत होतो. परंतु करंजे बाईचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. नारायण राणे शिवसेनेतून फुटले. त्यावेळी त्यांनी शिवसेना सोडली आणि दोन वेळा काँग्रेसकडून याच ठिकाणी उभ्या राहिल्या. त्यांचं दोन्ही वेळी डिपॉझिट गेले. त्यामुळे काय कार्य आहे, हे जनतेला माहिती आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा नगरसेवक त्यांचं डिपॉझिट जप्त करून जिंकून येईल”, असा दावा सुनील राऊत यांनी केला आहे.

“त्या कशासाठी गेल्या. त्यांच्यामध्ये किती कोटींचा व्यवहार झाला, याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. आर्थिक व्यवहारामुळेच त्या गेल्या आहेत. निष्ठा वगैरे काही नाही, आर्थिक बाबी असेल, तिथे त्या जातात”, असा आरोप सुनील राऊत यांनी केला.

    follow whatsapp