चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहर दुहेरी हत्याकांडाने हादरलं आहे. आजारी पत्नीचा सांभाळ करण्यात हयगय झाल्यामुळे संतापलेल्या सासऱ्याने आपली सून आणि पत्नीची हत्या करुन नंतर पोलिसांत आत्मसमर्पण केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार आजारी पत्नीला जेवण देण्यावरुन सासरा आणि सुनेत कडाक्याचं भांडण झालं. ज्यातून सासऱ्याने सुनेचा गळा आवळून जीव घेतला.
ADVERTISEMENT
आपण कोठडीत गेल्यानंतर पत्नीचं कसं होणार या भीतीने नंतर सासऱ्याने आपल्या पत्नीलाही संपवलं. मुलाने केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी या प्रकरणात सासऱ्याला अटक केली आहे. बल्लारपूर शहरात राहणारे काजल डे यांची पत्नी गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाने त्रस्त होती. प्रदीर्घकाळ रुग्णालयात राहिल्यानंतर ती घरी परत आली होती. डायलिसिसवर असलेल्या पत्नीची सुन प्रियंका व्यवस्थित देखभाल करत नसल्याने घरात वाद होते.
शुक्रवारी आपले काम आटोपून घरी आलेल्या आरोपीने आजारी पत्नीला जेवण दिले का? याबाबत सुनेला विचारले. यावरून “वेळ मिळेल तेव्हा देईन” असे उत्तर मिळाल्यावर भांडणाला सुरुवात झाली. भांडण विकोपाला गेल्यानंतर आरोपी काजल याने सुन प्रियंका हिचा गळा आवळून खून केला. मात्र आपण या कृतीने कोठडीत जाऊ असे लक्षात आल्यानंतर आपल्या पश्चात आजारी पत्नीची देखभाल कशी व्हावी अशी चिंता सतावल्यानंतर त्याने मरणासन्न अवस्थेतील पत्नीचाही गळा आवळून खून केला. त्याच स्थितीत काजल डे याने बल्लारपूर पोलीस स्टेशन गाठले व आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी गाठत दोघींनाही रुग्णालयात नेले. मात्र पत्नीचा आधीच मृत्यू झाला होता. तर रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही तासांनी सुनेचाही मृत्यू झाला. बल्लारपूर पोलीस ठाण्यात काजल डे यांच्या मुलाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी काजल डे याला अटक करून बल्लारपूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT











