सांगली: ‘शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पुढाकाराने स्थापित झालेलं सरकार किती बहुजनद्वेष्ट आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. यांना मराठा आरक्षणाविषयी, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी व पदोन्नतीतील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात कुठलेही पाऊल उचलण्याची घाई नाही , पण न्यायालयाच्या निर्णयाआधीच आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याची लगबग उडाली आहे.’ अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
‘सत्तेची वेसण बांधलेले काँग्रेसचे लाचार मंत्री काका-पुतण्यापुढे फक्त माना डोलवत आहेत. मी लवकरच माननीय सोनिया गांधींना तुमचे मंत्री किती फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांशी प्रेरित होऊन सत्तेत काम करतात, याबाबत माहिती देणार आहे.’ असं म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबतच काँग्रेसवर देखील टीका केली आहे.
याचवेळी त्यांनी अशीही टीका केली की, ‘पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारा शासन आदेश मागे घेणे दूरच उलट आरक्षण रद्दचा निर्णय अंमलात आणत राज्य सरकारने तब्बल 67 कक्ष अधिकाऱ्यांना अव्वर सचिवपदावर सेवाज्येष्ठतेनुसार बढती दिली आहे. पदोन्नतीतील आरक्षण पुन्हा लागू करा आणि शासन आदेश मागे घ्या. या मागणीसाठी आधी आक्रमक आणि आता मवाळ झालेल्या काँग्रेसची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरीत्या फेटाळून लावली आहे.’ असं म्हणत पदोन्नती आरक्षणाबाबत पडळकर यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
फडणवीसांचे लाडके असलेले गोपीचंद पडळकर सतत वादात का असतात?
‘ठाकरे सरकारच्या नावाखाली शरद पवारांनी येडं पेरलं आणि खुळं उगवलं’
दरम्यान, दोनच दिवसांआधी Corona मुक्त गाव या योजनेवरुन देखील गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होते.
‘Corona मुक्त गाव ही योजनाच फसवी आहे. ग्रामीण जनतेच्या दुःखाची सरकारने थट्टा केली आहे. एवढंच नाही तर शरद पवारांनी येडं पेरलं आणि खुळं उगवलं. अशी आघाडी सरकारची अवस्था झाली आहे.’ अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती.
‘ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा कोव्हिड 19 आणि Lockdown मुळे मोडला आहे. कित्येक घरातील कर्त्या माणसांचा यामध्ये मृत्यू झाला. त्यांच्या घरातील दुःखी माणसांचे अश्रू पुसण्याऐवजी, त्यांना आधार देण्याऐवजी मंत्र्यांना कोरोना मुक्त गाव अशा स्पर्धा योजना सुचत आहेत . सगळेच जर गावाने करायचे आहे तर सरकारने काय करायचे असा प्रश्न या कामचुकार मंत्र्यांबद्दल मला पडला आहे.’ अशी खरमरीत टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारवर केली होती.
‘यापूर्वी पत्रकार मृत्युमुखी पडल्यास 50 लाख रुपये देणार अशीही योजना आणली होती, प्रत्यक्षात 50 लाख रुपये कधी दिलेच नाहीत तर त्यांच्या घरी जाऊन सांत्वनही केले नाही. त्याच प्रकारची ही कोरोनामुक्त गावांना 50 लाखांचे बक्षीस ही फसवी योजना या सरकारने आणली आहे.’ असंही गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं होतं.
ADVERTISEMENT











