तीन पेक्षा जास्त आठवड्यांची विश्रांती घेतल्यानंतर आज मुंबईत पावसाने दमदार पुनरागमन केलं आहे. मुंबईसह ठाणे, रायगड आणि कोकणाच्या काही भागांमध्ये काल मध्यरात्रीपासून पावसाची संततधार कायम आहे. या पावसामुळे घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईला ब्रेक लागला आहे.
ADVERTISEMENT
मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असलेल्या मुंबई लोकलला या पावसाचा फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे मध्य रेल्वेच्या मार्गावर पाणी आल्यामुळे ठाण्यापुढे रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. मुलुंड ते माटुंगा या मार्गावरील फास्ट वाहतूक ट्रॅकवरील पाणी ओसरत नसल्यामुळे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी कामावर निघालेले अनेक कर्मचारी हे ठाणे स्टेशनमध्ये अडकून पडले आहेत.
दुसरीकडे पावसाची संततधार कायम असल्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीवरही झालेला पहायला मिळतो आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग, एअरपोर्ट रोड परिसरात वाहनांच्या रांगा दिसत असून अनेकांना आपल्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी दीड – दोन तास खर्च करावे लागत आहेत.
दरम्यान मुंबईत पावसाने काहीशी उसंत घेतलेली असली तरीही अनेक सखल भागांमध्ये पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे सामान्य लोकांना पुन्हा एकदा अडचणींचा सामना करावा लागतो आहे. दरम्यान काल मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे तुळशी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.
Mumbai Rain Update : पोलीस स्टेशन जलमय, सोसायट्यांमध्येही शिरलं पाणी; पावसामुळे मुंबईची दाणादाण
ADVERTISEMENT