मुंबई: मुंबई महानगरपालिका (BMC) ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असून, तिच्या निवडणुका नेहमीच राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असतात. 2017 च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यात थेट मुकाबला झाला होता. ही निवडणूक 21 फेब्रुवारी 2017 रोजी एकाच टप्प्यात पार पडली, तर निकाल 23 फेब्रुवारी रोजी जाहीर झाला होता. एकूण 227 जागांसाठी ही निवडणूक झाली, ज्यात मतदारांची संख्या सुमारे 91.8 लाख होती. तर मतदानाची टक्केवारी 55.34% इतकी नोंदवली गेली, जी गेल्या 25 वर्षांतील सर्वोच्च होती.
ADVERTISEMENT
निकाल: शिवसेना सर्वात मोठा पक्ष, भाजपची जोरदार मुसंडी
2017 च्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत (114 जागा) मिळाल्या नाही. तरीही शिवसेनेने सलग दुसऱ्यांदा सर्वात मोठा पक्ष म्हणून बाजी मारली. 2012 मध्ये शिवसेनेला 75 जागा मिळाल्या होत्या, तर 2017 मध्ये त्या 84 वर पोहोचल्या. भाजपने मात्र मोठी झेप घेत 2012 च्या 31 जागांवरून 82 जागा जिंकल्या, ज्यामुळे निवडणूक अटीतटीची झाली.
पक्षनिहाय जागांचे बलाबल (227 जागा):
- शिवसेना: 84 जागा (सर्वात मोठा पक्ष)
- भारतीय जनता पार्टी (BJP): 82 जागा
- काँग्रेस: 31 जागा
- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP): 9 जागा
- महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS): 7 जागा
- समाजवादी पार्टी (SP): 6 जागा
- ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM): 3 जागा
- अखिल भारतीय सेना: 1 जागा
- अपक्ष व इतर: 4 जागा
ही निवडणूक शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय वैमनस्याची सुरुवात मानली जाते. दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढत दिली होती, तरीही निकालानंतर भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिला होता.
शिवसेनेने मिळवलेलं महापौर पद
बीएमसीमध्ये महापौराची निवड नगरसेवकांकडून (कॉर्पोरेटर्स) थेट होते. महापौराचा कार्यकाळ 2.5 वर्षांचा असतो. 2017 च्या निवडणुकीनंतर महापौरपदासाठी 8 मार्च 2017 रोजी निवडणूक झाली होती.
हे ही वाचा>> आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी... 'उद्या 12 वाजता...' संजय राऊतांनी दिली अवघ्या महाराष्ट्राला ब्रेकिंग न्यूज!
विश्वनाथ महाडेश्वर (शिवसेना) यांनी 171 मतांसह विजय मिळवत महापौर पद पटाकवलं होतं. ते बांद्रा पूर्व (वॉर्ड क्र. 87) मतदारसंघातून निवडून आले होते.
तर उपमहापौर पदी हेमांगी वरळीकर (शिवसेना) वरळी गाव (वॉर्ड क्र. 193) मतदारसंघातून निवडून आलेल्या.
भाजपने महापौरपदासाठी दावा न करता शिवसेनेला पाठिंबा दिला होता, ज्यामुळे शिवसेनेला सत्ता कायम ठेवता आली होती. दरम्यान, 2019 साली किशोरी पेडणेकर या शिवसेनेच्याच महापौर झाल्या होत्या ज्या 2022 पर्यंत कायम होत्या. 2022 नंतर वेगवेगळ्या कारणांनी महापालिकांच्या निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे तेव्हापासून आतापर्यंत मुंबई महापालिकेत प्रशासक राजवट लागू होती.
दरम्यान, 2019 विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील संपूर्ण राजकारण बदललं ज्याचा परिणाम हा आता महापालिका निवडणुकांवर देखील जाणवतो आहे. अशावेळी यंदाची मुंबई महापालिका निवडणूक ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे.
हे ही वाचा>> मतदानाला EVM वर उमेदवाराचं नावच अन् मतमोजणीच्या दिवशी गायब, तरीही निकाल जाहीर... 7 कर्मचारी तडकाफडकी निलंबित
तर दुसरीकडे पहिल्यांदाच मुंबई महापालिका मिळविण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली असून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची रणनीती तयार केली आहे. गेल्या काही वर्षात भाजपने मुंबईत मोठी मजल मारली आहे. ज्यामुळे शिवसेना UBT समोर भाजपसारखं मोठं आव्हान आहे. तर दुसरीकडे शिंदेंची शिवसेनेने देखील ठाकरेंना पराभूत करण्यासाठी कंबर कसली आहे.
सध्याच्या घडीला मराठी माणूस आणि मुंबई या भोवती प्राथमिक प्रचार सुरू आहे. पण जसजशी निवडणूक जवळ येईल तसा प्रचाराचा खरं रंग चढू लागेल. त्यामुळे यावेळी मुंबईकर नेमकं कोणाच्या पारड्यात आपली मतं टाकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
प्रभाग रचना आणि मतदार नोंदणी
मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आगामी निवडणुकांसाठी प्रभागरचना (Ward Structure) आणि मतदार नोंदणी (Voter Registration) हे अत्यंत कळीचे मुद्दे ठरले होते. ज्याबाबत शिवसेना आणि विरोधकांनी अनेका आक्षेप घेतले होते. मात्र, अखेर त्यावर काही तात्पुरते उपाययोजना करत राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या.
1. प्रभागरचना (Ward Structure)
मुंबई महानगरपालिकेतील जागांची संख्या आणि सीमांकन (Delimitation) हा गेल्या दोन वर्षांपासून वादाचा आणि चर्चेचा विषय राहिला आहे.
जागांची संख्या: 2017 मध्ये मुंबईत 227 प्रभाग (Wards) होते. महाविकास आघाडी सरकारने ही संख्या वाढवून 236 केली होती, परंतु नंतर आलेल्या महायुती सरकारने पुन्हा ती 227 वर आणली. सध्याच्या स्थितीनुसार आगामी निवडणूक 227 जागांवरच होण्याची शक्यता आहे.
प्रभाग फेररचना: 2011 च्या जनगणनेच्या आधारावरच सध्याचे प्रभाग निश्चित आहेत.
आरक्षण (Reservation): महिलांसाठी 50% जागा राखीव आहेत. तसेच अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि ओबीसी (OBC) आरक्षणाबाबतच्या न्यायालयीन निर्णयानुसार प्रभागांचे आरक्षण सोडतीद्वारे (Lottery) जाहीर करण्यात आले आहे.
2. मतदार यादीत नाव कसे तपासायचे?
तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही, हे तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
- electoralsearch.eci.gov.in या वेबसाइटवर जा.
- तुमचा EPIC नंबर (मतदार ओळखपत्र क्रमांक) टाकून शोध घ्या.
- किंवा तुमच्या वैयक्तिक तपशिलावरून (नाव, जन्मतारीख) शोध घ्या.
आगामी निवडणुकीसाठी महत्त्वाचे बदल
डिजिटल व्होटर कार्ड (e-EPIC): आता तुम्ही तुमचे डिजिटल मतदार ओळखपत्र मोबाइलमध्ये डाऊनलोड करू शकता, जे भौतिक कार्ड इतकेच वैध आहे.
आधार लिंक: मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाकडून केले जात आहे, जेणेकरून बोगस मतदानाला आळा बसेल.
ADVERTISEMENT











