Devendra Fadnavis campaign rally for candidates with extortion cases : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. मात्र, ज्या उमेदवारांवर किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांवर खंडणी, मारहाण, धमकी, जमिनीवर कब्जा, तसेच इतर गंभीर आरोपांचे गुन्हे दाखल आहेत. अशा उमेदवारांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार का? याबाबत विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित होत आहेत.
ADVERTISEMENT
नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
नाशिक जिल्ह्यात मागील आठ महिन्यांत झालेल्या तब्बल 43 हत्यांनंतर पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली होती. जगदीश पाटील (गोळीबार प्रकरण), उदय निमसे (मारहाण प्रकरण), तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रकाश लोंढे आणि त्यांचे पुत्र (खंडणी प्रकरण) यांच्यासह अनेक सत्ताधारी नेते आणि गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही काही दिवसांपूर्वी कोणालाही पाठीशी न घालता कारवाई सुरू राहत असल्याचे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात निवडणुकीत उतरणाऱ्या अनेक उमेदवारांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे आणि हा विरोधाभास आता चर्चेचा विषय ठरत आहे.
हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर : ट्रॅफिक पोलिसाच्या अंगावर रिक्षा घातली, अन् नंतर फरफटत नेलं; पाहा व्हिडीओ
त्र्यंबकेश्वर निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कैलास घुले यांच्यावर जागेच्या वादातून दमदाटी व मारहाण केल्याची तक्रार आहे. शिंदे गटाच्या नगराध्यक्ष उमेदवार त्रिवेणी तुंगार-सोनवणे यांच्या पतीवर, तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार रवी उर्फ बाळा सोनवणे यांच्यावरही गंभीर आरोप आहेत. भाजपच्या प्रभाग 1 च्या उमेदवार अनिता बागूल यांचे पती शांताराम बागूल, तर प्रभाग 4 मधील उमेदवार कैलास चोथे आणि संकेत देवरे हे सातपूरच्या खंडणी प्रकरणात संशयित आहेत. या व्यक्तींवर गुन्हे दाखल असतानाही पोलीस अद्याप त्यांच्या अटकेपर्यंत पोहोचलेले नाहीत, नोटीस दिली आहे का? हेही स्पष्ट नाही.
नाशिक जिल्ह्यातील कुख्यात प्रकाश लोंढे व त्यांचा पुत्र भूषण लोंढे यांच्याविरोधात हत्या, धमकी, खंडणी, मालमत्ता बळकावणे अशा अनेक गुन्ह्यांची नोंद असून, भूषण लोंढेवर मकोका अंतर्गतही कारवाई झाली आहे. सातपूर पोलिस ठाण्यात जमीन ताब्यात घेणे आणि फिर्यादीला शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागणे या प्रकरणात नव्याने गुन्हा दाखल झाला आहे. नागेश व भावेश मटाले यांना अटक करण्यात आली असली तरी उर्वरित आरोपी अद्याप पसार आहेत. मात्र त्यांपैकी अनेक जण निवडणूक प्रचारात सक्रिय असल्याचे दिसत आहे.
विशेष म्हणजे, आरोपी शांताराम बागूल हे रिपाइंचे कार्यकर्ते असून त्यांची पत्नी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. रविवारी संध्याकाळी ते मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत दिसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तालुक्यातील वादग्रस्त जमीन व्यवहारांमध्ये त्यांचा सहभाग असल्याची माहितीही पोलिस सूत्रांनी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अशा आरोपित उमेदवारांच्या समर्थनार्थ सभा घेणार का? आणि सभा झाल्यास त्याच दिवशी संबंधित आरोपींवर पोलीस कारवाई होणार का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कायद्याची अंमलबजावणी आणि राजकीय फायद्यांमध्ये संघर्ष दिसत असलेल्या या परिस्थितीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











