Lok Sabha 2024 : एकनाथ शिंदे, अजित पवारांच्या बंडाचा ठाकरे-पवारांना फायदा; भाजपचं काय?

भाग्यश्री राऊत

13 Mar 2024 (अपडेटेड: 13 Mar 2024, 03:25 PM)

Lok Sabha 2024 Maharashtra : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना विरोधी कौल मिळताना दिसत आहे.

एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना बंडाचा फटका बसताना दिसत आहे.

महाराष्ट्रात आजघडीला लोकसभा निवडणूक झाल्यास एकनाथ शिंदे-अजित पवारांपेक्षा ठाकरे-पवारांना फायदा होताना दिसत आहे.

follow google news

Lok Sabha elections Maharashtra : लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्यातील दोन मोठे पक्ष फुटले. शिवसेना आणि राष्ट्रवादीची दोन दोन शकलं झाली. येत्या लोकसभा निवडणुकीत त्याचे परिणाम होणार हे नक्की आहे. पण, दोन्ही पक्षामध्ये पडलेली ही फूट महाराष्ट्रातील जनतेला आवडली की नाही? पक्ष फुटल्यानंतर जनतेची साथ कोणाला? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, शरद पवार की अजित पवार... नेमकी कोणाला किती पसंती? एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेऊन भाजपला फायदा होतोय का? 

हे वाचलं का?

शिवसेना फुटली. एकनाथ शिंदे भाजपसोबत सत्तेत गेले. त्यांना शिवसेना मूळ पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं. महायुतीत निवडणूक लढवणार असल्यानं शिंदेंना भाजपचा पाठिंबा असणार आहे. उद्धव ठाकरेंकडे त्यांचा ओरिजनल पक्ष नाही आणि ओरिजनल चिन्ह नाही. त्यांना मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. 

दुसरीकडे जे शिवसेनेचं झालं तेच राष्ट्रवादीत झालं... अजित पवार पक्ष घेऊन बाजूला झाले. आता राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांकडे आहे. शरद पवारांकडे त्यांचा ओरिजनल पक्ष आणि ओरिजनल निवडणूक चिन्हही नाही. 

शरद पवार गटाला तुतारी या नवीन चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवावी लागणार आहे. पण, या दोन्ही पक्षात झालेल्या फुटीचा कसा परिणाम होईल? मतदारांची सगळ्यात जास्त पसंती कोणाला आहे? तर सकाळ माध्यम समूहाने केलेल्या सर्व्हेमधून ही आकडेवारी समोर आली...

ठाकरेंची सेना शिंदे सेनेपेक्षा भारी... भाजपनं पहिल्या क्रमांकावर

लोकसभा निवडणुकी आपण कुणाला मतदान कराल, असा प्रश्न या सर्वेक्षणामध्ये विचारला गेला. त्यात 33.6 टक्के मते घेऊन भाजप सगळ्या मोठा पक्ष ठरला आहे. तर काँग्रेस हा राज्यातील दुसरा क्रमांकाचा पक्ष ठरला असून त्यांना 18.5 टक्के मते मिळाली आहे.

हेही वाचा >> भाजपने एकाच दगडात मारले दोन पक्षी, लोकसभेत फायदा होणार का? 

आता महत्वाचं म्हणजे या फोडाफोडीच्या राजकारणानंतरही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जनाधार घटलेला दिसत नाही. 12.5 टक्के लोकांनी ठाकरेंच्या शिवसेनेला मते दिली असून, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला फक्त 4.9 टक्के लोकांनी मते दिली आहेत. म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनाच सर्वाधिक लोकांची पसंती दिसतेय...

आता राष्ट्रवादीबद्दल...

शरद पवार ज्यांच्याकडे मूळ पक्ष आणि मूळ चिन्ह नाही, त्यांच्या नव्या पक्षाला 12.6 टक्के मते मिळाली आहे, तर अजित पवार ज्यांच्याकडे मूळ पक्ष आणि मूळ निवडणूक चिन्ह आहे त्यांना फक्त 3.9 टक्के मतं मिळाली आहेत. म्हणजेच फोडाफोडीचं राजकारण जनतेला आवडलं नसून, आधी ज्यांचा पक्ष होता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनाच जनता पसंती देताना दिसतेय.

याचाच दुसरा अर्थ काढायचा झाला तर भाजपनं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सर्वाधिक जास्त जागा मिळविण्यासाठी सोबत घेतलं. पण, त्याचा फायदा भाजपला होताना दिसत नाही. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना अजूनही जनतेची पसंती मिळत नसल्याचं या सर्व्हेतून दिसतंय...कारण, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना झाला तर महायुतीला फटका बसताना दिसतोय.

हेही वाचा >> भाजपच्या खासदारांची धडधड वाढली; पक्ष देणार झटका? 

महायुतीला फक्त 40.3 टक्के मतं मिळताना दिसतात, तर महाविकास आघाडी वरचढ ठरत असून त्यांना 45.7 टक्के मतं मिळताना दिसतात. शिवसेना आणि राष्ट्रवादीसारख्या दोन पक्षांना सोबत घेऊनही त्याचा फायदा भाजपला होताना दिसत नाही. उलट ज्यांचा पक्ष फुटला त्यांच्याप्रति जनतेची सहानुभूती या सर्व्हेतून तरी दिसून येते...हा एक सर्व्हे आहे...पण, प्रत्यक्ष निवडणूक निकालानंतरही चित्र असंच राहील का? हे बघावं लागेल.

    follow whatsapp