Maharashtra Politics : गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रात आणि खासकरुन 2019 पासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालेला पाहायला मिळालं. अनेक बड्या नेत्यांनी सातत्याने पक्ष बदलले. महाराष्ट्रातील दोन पक्षात फुट पडून दोन वेगळे पक्ष निर्माण झाले. शिवाय, राष्ट्रीय पक्षांनी देखील विचारधारा न पाहाता मतांची ताकद बघून अनेक नेत्यांना पक्ष प्रवेश दिलाय. भारतीय जनता पक्षाने तर ज्यांच्यावर आरोप केले अशा नेत्यांना देखील पक्षात घेतलं. शिवाय पक्षप्रवेशचं नाही तर मोठं-मोठ्या पदांवर कामाची संधी दिली. महाराष्ट्रातील गेल्या काही निवडणुका पाहिल्या तर पैशांचा देखील मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचं समोर आलं. त्यामुळे कोणत्या पक्षाला विचारधारा आहे की नाही? असा प्रश्न पडलेला पाहायला मिळाला. या सगळ्या पार्श्वभूमीवर CVoter चा सर्व्हे समोर आलाय. या सर्व्हेतून महाराष्ट्रातील सर्वात तत्वनिष्ठ पक्ष कोणता? या संदर्भात देखील प्रश्न विचारण्यात आला. लोकांनी तत्त्वनिष्ठ म्हणून कोणत्या पक्षाला पसंती दिलीये? जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT
मुंबईतील मतदारांमध्ये महाराष्ट्रातील सध्याच्या प्रमुख पक्षांपैकी कोणता पक्ष अधिक तत्त्वनिष्ठ आहे असं वाटतं? याचा आढावा घेणारा CVoter चा सर्व्हे सध्या चर्चेत आला आहे. 8 जानेवारी 2026 रोजी घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणात 18 वर्षांवरील 1241 मतदारांचा समावेश आहे. CATI interviews (Computer Assisted Telephone Interviewing)पद्धतीने हा सर्व्हे करण्यात आलाय. 95 टक्के विश्वासार्हतेसह ±5 टक्के त्रुटीमर्यादेत हा सर्व्हे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या सर्वेक्षणात “महाराष्ट्रातील सध्याच्या प्रमुख पक्षांपैकी कोणता पक्ष अधिक तत्त्वनिष्ठ आहे?” असा थेट प्रश्न मतदारांना विचारण्यात आला. एकूण सर्व्हे पाहता भाजप (27.6 टक्के) पहिल्या क्रमांकावर असून, काँग्रेस (24 टक्के) दुसऱ्या स्थानावर आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) 15.7 टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर, तर शिंदे गटाची शिवसेना 11.6 टक्क्यांसह चौथ्या स्थानी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला 5.1 टक्के, तर शरद पवार गटाला केवळ 2.2 टक्के प्रतिसाद मिळाला आहे. सुमारे 10 टक्के मतदारांनी ‘कोणताही पक्ष तत्त्वनिष्ठ नाही’ असे मत नोंदवले असून, जवळपास 4 टक्के मतदार संभ्रमात असल्याचे चित्र आहे.
तरुणांचा कल कुणाकडे?
18 ते 24 वयोगटातील मतदारांमध्ये काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे 31.8 टक्के पाठिंबा मिळाल्याचे दिसते. हा कल भाजपच्या (24.8 टक्के) तुलनेत लक्षणीय आहे. मात्र 35 ते 54 वयोगटात भाजपचा प्रभाव वाढलेला दिसतो. 35–44 वयोगटात भाजपला 34.3 टक्के, तर 45–54 वयोगटात 33.4 टक्के प्रतिसाद मिळाला आहे. ज्येष्ठ मतदारांमध्ये (55 वर्षांवरील) भाजप आणि काँग्रेस यांच्यात जवळपास बरोबरीची लढत असल्याचे चित्र आहे.
अनुसूचित जाती व दलित मतदारांमध्ये कोणाला पसंती?
अनुसूचित जाती व दलित मतदारांमध्ये काँग्रेसला तब्बल 46 टक्के प्रतिसाद मिळाला असून, भाजप केवळ 15.8 टक्क्यांवर आहे. इतर मागासवर्गीयांमध्ये (OBC) मात्र भाजपने आघाडी घेतली असून 39.4 टक्के मतदारांनी भाजपला तत्त्वनिष्ठ पक्ष मानले आहे. उच्चवर्णीय हिंदू मतदारांमध्येही भाजप (31.7 टक्के) आघाडीवर आहे.
मुस्लिम मतदार कोणाला तत्वनिष्ठ मानतो?
मुस्लिम मतदारांमध्ये काँग्रेस (27.1 टक्के) आणि ‘कोणताही पक्ष नाही’ (22.9 टक्के) हे दोन प्रमुख पर्याय ठरले आहेत. भाजपला या गटात केवळ 12.1 टक्के प्रतिसाद मिळाल्याने पक्षासमोरील आव्हान अधोरेखित होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











