राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणामागील गूढ! अजितदादांना नेमकं काय हवं होतं?

Merger of NCP : अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्रातील राजकारणावर अनिश्चिततेचे सावट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट संभाव्य विलीनीकरणाबाबत परस्परविरोधी दावे करत आहेत. शरद पवार गटाचे म्हणणे आहे की, अजित पवार यांना विलीनीकरण हवे होते; तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी अशा प्रकारची कोणतीही चर्चा झाल्याचं नाकारलं आहे.

Merger of NCP

Merger of NCP

ऋत्विक भालेकर

• 10:27 AM • 03 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणामागील गूढ!

point

अजितदादांना नेमकं काय हवं होतं?

Merger of NCP : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्राचे राजकारण अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत आता परस्परविरोधी दावे समोर येत आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे प्रमुख शरद पवार यांनी असा दावा केला आहे की, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत अजित पवार यांच्याशी उच्चस्तरीय चर्चा सुरु होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी अशी कोणतीही चर्चा झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, 'अजित पवार हे माझ्या अतिशय जवळ होते आणि त्यांनी कधीही विलीनीकरणाचा उल्लेख केला नव्हता.'

हे वाचलं का?

फडणवीसांनी पुढे असेही सांगितले की, 'महायुती सरकारमध्ये अजित पवार यांच्या पदाला कोणताही धोका नव्हता, त्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याची किंवा विलीनीकरणाकडे जाण्याची शक्यता कमी होती.' राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनीही स्पष्ट केले की, 2023 मध्ये एनडीएमध्ये सामील होण्याचा निर्णय अंतिम होता आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी विलीनीकरणावर कोणतीही चर्चा झाली नव्हती. तटकरे म्हणाले की, 'राष्ट्रवादी (अजित पवार) आता एनडीएचा भाग आहे आणि शरद पवार यांना त्यांचा पक्ष सत्ताधारी आघाडीत सामील करायचा आहे की नाही, हे त्यांनीच ठरवायचे आहे.'

हे ही वाचा : राहुल गांधींना का आणि कशासाठी संसदेत बोलण्यापासून रोखलं? असा विषय तरी काय ज्यामुळे लोकसभेत तुफान राडा?

'बंद दाराआड' चर्चा  झाल्याचा शरद पवार यांचा खुलासा

दुसरीकडे, शरद पवार यांनी कोणाचेही नाव न घेता या विरोधाला उत्तर दिले. त्यांनी स्पष्ट केले की, 'विलीनीकरणाची चर्चा 'बंद दाराआड' झाली होती. या चर्चेत केवळ अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचा समावेश होता. देवेंद्र फडणवीस आणि सुनील तटकरे यांसारखे लोक या खाजगी गटाच्या बाहेर होते, त्यामुळे या विषयावर बोलण्यासाठी त्यांच्याकडे कोणतीही अधिकृत माहिती नाही' असेही ते म्हणाले.

सुनेत्रा पवार यांची नियुक्ती

या संघर्षातच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीमध्ये नेतृत्वाचा पेच निर्माण झाला आहे. प्रफुल्ल पटेल आणि पक्षाचे इतर कार्यकर्ते सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांचा राजकीय वारसा सोपवण्याचा प्रयत्न करत आहेत. सुनेत्रा पवार यांची पक्षविधीमंडळ नेतेपदी निवड झाली असून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे. याविषयी काहीच माहिती नसल्याचे शरद पवार यांनी सांगितल्याने कुटुंब आणि पक्षातील दरी अधिकच रुंदावल्याचं दिसत आहे.

हे ही वाचा : 'आयुष्यभर तुमच्यासोबत..', विदीप जाधवांच्या पत्नीचं सांत्वन करताना सुनेत्रा पवार काय म्हणाल्या? VIDEO

पार्थ पवार आणि भावी राजकारण

भाजपने अजित पवार यांचे मोठे चिरंजीव पार्थ पवार यांना मुंढवा जमीन प्रकरणामुळे 'लो प्रोफाईल' राहण्याचा सल्ला दिल्याने तणाव आणखी वाढला आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर पार्थ पवार यांना पाठवण्याचा विचार राष्ट्रवादी करत असल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे, ज्या वेळी सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत होत्या, त्याच वेळी पार्थ पवार हे शरद पवार यांच्यासोबत एका बंद खोलीत त्यांच्या वडिलांच्या (अजित पवार) स्मारकाबाबत चर्चा करत होते. सध्या भाजप शरद पवार गटाला महायुतीत सामील करुन घेण्यास संकोच करत आहे. या पेचप्रसंगामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या शक्यता थांबल्या आहेत. दोन्ही गट सत्तेवर नियंत्रण मिळवण्यासाठी धडपडत असताना आणि भाजप पडद्यामागून राज्याची राजकीय समीकरणे बदलत असताना, राष्ट्रवादीचे भविष्य सध्या अधांतरी आहे.

    follow whatsapp