मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने मोठी हालचाल सुरू केली आहे. पक्षाने 8 जागांसाठी सुमारे 25 ते 30 नावे शॉर्टलिस्ट करून दिल्लीच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली आहेत. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बुधवारी रात्री झालेल्या भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत विधान परिषद उमेदवारांच्या नावांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीनंतर काही नावांचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आला असल्याची सूत्रांची माहिती आहे. पक्ष संघटनेत दीर्घकाळ काम केलेल्या नेत्यांना संधी देण्यासोबत नवीन चेहऱ्यांना पक्षात स्थान देण्यावर भर देण्यात येत आहे.
प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब
विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी माजी काँग्रेस नेते आणि नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणूक 12 मे रोजी होणार आहे. या जागेसाठी प्रज्ञा सातव यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता मजबूत आहे.
शॉर्टलिस्टेड नावांची यादी
भाजपकडून शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या प्रमुख नावांमध्ये खालील नेत्यांचा समावेश आहे:
- माधवी नाईक
- डॉ. उपेंद्र कोठेकर
- मनोज कोटक
- केशव उपाध्ये
- रवी अनासपुरे
- राजेश पांडे
- दयाशंकर तिवारी
- राम सातपुते
- रणजितसिंह निंबाळकर
- संजय काका पाटील
- विवेक कोल्हे
- जगदीश मुळीक
- प्रमोद जठार
- संजय केणेकर
- अर्चना पाटील-चाकूरकर
- दादाराव केचे
- संजय भेंडे
- संदीप जोशी
या यादीत संघटनेत सक्रिय असलेले नेते, जिल्हा पातळीवर काम करणारे कार्यकर्ते आणि काही नवे चेहरे यांचा समावेश आहे. काही नावे दिग्गज नेत्यांची असून, काही नावे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची आहेत.
हे ही वाचा>> मविआची विधानपरिषदेची एकमेव जागा, सुप्रिया सुळेंची 'त्या' नेत्यासाठी फिल्डिंग, थेट फेसबुक पोस्ट
निवडणुकीचा कार्यक्रम
विधान परिषदेच्या 9 नियमित जागांसह प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या 1 जागेची पोटनिवडणूक एकूण 10 जागांसाठी 12 मे रोजी होणार आहे. महायुतीला यातील बहुतेक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप स्वतंत्रपणे 4 ते 6 जागा लढवण्याची रणनीती आखत आहे.
हे ही वाचा>> मातोश्रीवर विधानपरिषदेच्या एकमेव जागेसाठी 4 नेत्यांचं लॉबिंग, पण काँग्रेसने उद्धव ठाकरेंसमोर ठेवली 'ती' अट
पक्षातील सूत्रांनी सांगितले की, उमेदवारांच्या अंतिम यादीत केंद्रीय नेतृत्वाची मंजुरी घेतल्यानंतर लवकरच जाहीरता होईल. कोअर कमिटी बैठकीत फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चर्चा झाली असून, पक्षातील विविध गटांच्या संतुलनाकडे लक्ष देण्यात आले आहे.
ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी ठरू शकते, कारण विधान परिषदेत मजबूत उपस्थितीमुळे विधेयके, चर्चा आणि धोरणनिर्मितीवर नियंत्रण ठेवता येते. भाजपकडून संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
ADVERTISEMENT











