Manoj Jarange Patil phone call to Sanjay Jadhav : परभणीत आज (दि.30) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकरी आणि युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, त्यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशानंतर ठाकरे सेनेतील काही पदाधिकारी आणि नेतेही शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या कार्यक्रमावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत उपोषण सुरू असताना परभणीत कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : सरकारचा घोषणांचा पाऊस, शेतकऱ्याच्या हातात काहीच नाही? टोमॅटो शेतीवर नांगर फिरवला
कार्यक्रम तात्काळ रद्द करा, अन्यथा मी तिथं येईल - मनोज जरांगे
मनोज जरांगे पाटील यांनी खासदार संजय जाधव यांच्याशी फोनवर संवाद साधताना कार्यक्रम तात्काळ रद्द करण्याची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे. “आपल्यासाठी समाज महत्त्वाचा आहे. हा कार्यक्रम तात्काळ रद्द करा, अन्यथा मी तिथं येईल,” असा इशारा जरांगे यांनी दिला. मराठा समाजासाठी प्रमाणपत्रांचा मुद्दा महत्त्वाचा असून, तोपर्यंत कार्यक्रम घेऊ नका, अशी भूमिका त्यांनी मांडल्याचे दिसते. शिंदे साहेबांनी यावे आणि प्रमाणपत्र द्यावे, त्यानंतर कार्यक्रम घ्या, असेही ते म्हणाले.
हेही वाचा : 'बोलता येणार नाही, शेवटचं बोलतोय', मनोज जरांगेंनी समाजाला काय सांगितलं?
जरांगे यांनी यावेळी आपण उपोषण किंवा आंदोलन सोडून कार्यक्रमस्थळी जाण्याचा निर्णय सहसा घेत नसल्याचेही म्हटले आहे. मात्र, परभणीतील कार्यक्रम झाला तर आपण स्वतः उपोषण बंद करून तिथे येऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरू शकतात आणि त्यामुळे परिस्थिती अस्थिर होऊ शकते, असेही त्यांनी फोनवरील संभाषणात म्हटले. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी त्यांनी पुन्हा केली.
अन्यथा तुमच्यावर खापर फुटेल, जरांगेंचा जाधवांना इशारा
दरम्यान, फोनवर बोलताना जरांगे यांनी कार्यक्रम रद्द न केल्यास त्याची जबाबदारी खासदार संजय जाधव यांच्यावर येईल, असा इशाराही दिल्याचे दिसते. “तुमच्यावर खापर फुटेल, तुम्ही मुद्दाम मराठ्यांच्या उरावर कार्यक्रम घडवून आणला,” अशी तंबीही जरांगेंनी दिली. तसेच, “लवकर रद्द करा,” असे सांगत त्यांनी कार्यक्रमाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे परभणीत आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी आणि युवा संवाद मेळाव्यावरून मनोज जरांगे पाटील आणि खासदार संजय जाधव यांच्यातील फोनवरील संवाद चर्चेत आला आहे.
ADVERTISEMENT












