धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत सर्वात मोठी अपडेट, पाहा सरकारने CJP ला नेमकं सांगितलं तरी काय

मुंबई तक

24 Jul 2026 (अपडेटेड: 24 Jul 2026, 03:49 PM)

Cockroach Janta Party Protest: नीट पेपरफुटी आणि शिक्षण सुधारणांवरून झुरळ जनता पक्षाचे आंदोलन सुरूच आहे. तर दुसरीकडे काही वेळापूर्वीच सरकार आणि सीजेपीच्या प्रतिनिधी मंडळाची बैठक पार पडली. पाहा या बैठकीत नेमकं काय घडलं?

modi government positive on 2 demands sought time until tomorrow afternoon regarding dharmendra pradhan resignation states cjp

फोटो सौजन्य: ANI

Google CTA

नवी दिल्ली: झुरळ जनता पक्षाने (CJP) आज देशव्यापी आंदोलनाचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे थोड्याच वेळापूर्वी CJP च्या शिष्टमंडळाची सरकारसोबत चर्चा पार पडली. या चर्चेत नेमकं काय घडलं हेच आपण सविस्तर जाणून घेऊया.

हे वाचलं का?

सोनम वांगचुक यांनी काल मध्यरात्री आपलं उपोषण मागे घेतलं. तब्बल 26 दिवस त्यांचं उपोषण हे सुरू होतं. मात्र, असं असलं तरी सीजेपीने एक गोष्ट स्पष्ट केली की, जोवर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील. दुसरीकडे सरकारने सीजेपीला अनेक मुद्द्यांवर कारवाईचे आश्वासन दिले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही व्हिडिओच्या माध्यमातून आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर सरकारची काय भूमिका? 

कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये CJP आणि सरकारी प्रतिनिधी मंडळांमध्ये बैठक पार पडली. ज्याचे फोटोही समोर आले आहेत. CJP प्रतिनिधी मंडळात सौरभ दास आणि आशुतोष रांका यांचा समावेश होता. तर सरकारच्या बाजूने जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह उपस्थित होते. कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये CJP आणि सरकार यांच्यातील ही बैठक अंदाजे 50 मिनिटे चालली.

हे ही वाचा>> Jantar Mantar वर CJP चं विद्यार्थी आंदोलन कव्हर करणाऱ्या मंबई Tak प्रतिनिधीसोबत काय घडलं?

ज्यानंतर CJP चे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी सांगितले की, मंत्र्यांसोबतची बैठक अंदाजे 10 मिनिटे चालली. त्यांनी सांगितले की, त्यांच्या तीन मागण्यांपैकी दोन मागण्यांवर सरकार सकारात्मक दिसत आहे. सौरभ दास यांच्या मते, बाधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची भरपाई देण्याच्या प्रस्तावावर सरकार सकारात्मक आहे. शिवाय, आंदोलकांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरच्या मुद्द्यावरही सरकार सकारात्मक दिसले. 

पण, तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मागणीबाबत सरकारने CJP ला नेमकं काय आश्वासन दिलं याकडेच सर्वाचं लक्ष लागून राहिलं होतं. ज्याबाबत बोलताना सौरभ दास म्हणाले की, 

'धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत सरकारने पुन्हा एकदा आमच्याकडे वेळ मागितला आहे. उद्या सकाळी सरकारसोबत पुन्हा आमची चर्चा होईल. आम्हाला आशा आहे की, उद्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला जाईल. आम्ही सरकारला सांगितलं आहे की, हे आंदोलन खूप मोठं होत आहे. अवघ्या देशात हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे याबाबत लवकरच निर्णय झाला नाही तर CJP ला पुन्हा एकदा देशव्यापी आंदोलनाची हाक द्यावी लागेल.' 

असं म्हणत त्यांनी धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्याबाबत CJP ठाम असल्याचं स्पष्ट केलं.

हे ही वाचा>> दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना इशारा, राहुल गांधी भडकले

पेपर लीक वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दोन स्तरांवर पुढाकार घेतला आहे. मंत्रिमंडळाने नवीन पेपर लीक विधेयकाच्या मसुद्यावर चर्चा केली, तर कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये CJP आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये चर्चा झाली. सरकार संवादाद्वारे आंदोलन सोडवण्याचा आणि त्याच वेळी कायदा अधिक कडक करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जातंय.

नीट पेपरफुटी आणि शिक्षण सुधारणांवरून सीजेपी बऱ्याच काळापासून आंदोलन करत आहे. ही संघटना दिल्लीतील जंतर मंतर येथे धरणे आंदोलन करत आहे. 20 जुलै रोजी, आंदोलक संसदेच्या दिशेने मोर्चा नेत असताना, त्यांची पोलिसांनी आंदोलकांवर अमानुष लाठीहल्ला केला. ज्यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले. तेव्हापासून हे आंदोलन अधिक तीव्र झालं आहे.