MPSC Student Pune Protest : पुण्यात MPSCच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा आयोजित करण्यात आला असून विविध परीक्षांमधील पेपरफुटी आणि MPSCच्या कारभाराच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आक्रोश व्यक्त केला. ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आयोगाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. MPSCच्या पेपरफुटीच्या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचा आयोगावरील विश्वासाला तडा गेला असून अध्यक्षांचा राजीनामा झाला पाहिजे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. काही विद्यार्थ्यांनी आयोगाकडून पैसे घेतले जात असल्याच्या चर्चेचा उल्लेख करत एका पोस्टसाठी 40 लाख, 50 लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या चर्चेबाबत सवाल उपस्थित केले. मात्र, या रकमेबाबत केवळ चर्चा असल्याचेही विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : ‘मी पुन्हा आमदार होणार’, डोंबिवलीत भाजपला मोठा धक्का देताच मनसे नेते राजू पाटलांचं खळबळजनक विधान
आयोगाच्या चुकीच्या उत्तरांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान
मोर्चामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, पेपरफुटीचे पुरावे समोर आल्यानंतरही राजीनामा झालेला नाही, हा लाखो विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. भिवंडी, नगर, हिंगोली, अकोला, बुलढाणा आणि सोलापूरसह विविध भागांतून विद्यार्थी MPSCच्या तयारीसाठी पुण्यात आले आहेत. काही विद्यार्थी दोन ते चार वर्षांपासून अभ्यास करत आहेत. शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी पुण्यातील राहणीमानाचा खर्च, घरून मिळणारे मर्यादित पैसे आणि त्यातून करावा लागणारा संघर्ष याबाबतही भावना व्यक्त केल्या. हिंगोलीच्या विद्यार्थ्याने आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सांगताना सध्या शेतातील सोयाबीन सुकत असल्याचे म्हटले. घरच्यांना परीक्षेच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना नसल्याचेही त्याने सांगितले. अकोल्याच्या विद्यार्थिनीने आयोगाच्या चुकीच्या उत्तरांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे म्हटले.
हेही वाचा : मुलगी ठेवायची शारीरिक संबंध, बाप करायचा ब्लॅकमेल! पण ‘ती’ भयंकर घटना अन्…
MPSCच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी
या विद्यार्थ्यांमध्ये MPSCच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने करण्यात आली. एका विद्यार्थ्याने सांगितले की, केवळ राजीनामा घेणे हा मुद्दा नसून त्यानंतर येणाऱ्या व्यवस्थेवरही चुकीचे काम केल्यास राजीनामा होऊ शकतो, अशी भीती राहणे गरजेचे आहे. पारदर्शक आणि चांगला अधिकारी आयोगाच्या अध्यक्षपदी नेमला जावा, अशीही मागणी करण्यात आली. एका विद्यार्थ्याने MPSCच्या तयारीसाठी नोकरी सोडल्याचे सांगितले. त्याने चार वर्षे इकॉनॉमिक रिसर्च कंपनीमध्ये नोकरी केल्यानंतर पैसे साठवले आणि आता पूर्णवेळ नागरी सेवा परीक्षांची तयारी करण्यासाठी नोकरी सोडल्याचे सांगितले. मात्र, पेपरफुटीच्या चर्चांमुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात आपण या व्यवस्थेत टिकणार की नाही, अशी भीती निर्माण झाल्याचे बुलढाण्याच्या विद्यार्थ्याने सांगितले.
दरम्यान, या मोर्चात पदवीधर आमदारांवरही विद्यार्थ्यांनी जोरदार नाराजी व्यक्त केली. एका विद्यार्थ्याने पदवीधर आमदारांची नावे घेत मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, पुणे पदवीधर, नाशिक पदवीधर, संभाजीनगर पदवीधर, अमरावती पदवीधर आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातील आमदार विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवत नसल्याचा आरोप केला. निरंजन डावखरे, अनिल परब, अरुण लाड, सत्यजित तांबे, धीरज निगडे, सतीश चव्हाण आणि अभिजीत वंजारी यांची नावे घेत विद्यार्थ्यांनी सवाल उपस्थित केले. विद्यार्थ्यांच्या मतांवर निवडून आलेल्या पदवीधर आमदारांनी विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवावा, अशी मागणी करण्यात आली. “पदवीधर आमदार कुठेत?” असा सवाल करत विद्यार्थ्याने पदवीधर आमदारांची अख्खी यादीच वाचून दाखवली. पेपरफुटी, भ्रष्टाचाराच्या चर्चांमुळे आणि अभ्यासाच्या अनिश्चित वातावरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये असलेला रोष या आंदोलनातून समोर आला.
ADVERTISEMENT












