शरद पवारांचा थेट राहुल गांधींवर हल्ला, अदाणींवरील आरोपांवरून पिळले कान

मुंबई तक

07 Apr 2023 (अपडेटेड: 07 Apr 2023, 01:43 PM)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अदाणी समूह – हिंडेनबर्ग प्रकरणावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना जोरदार चपराक लगावली आहे.

Nationalist Congress Party chief Sharad Pawar has come out strongly in support of the Adani Group

Nationalist Congress Party chief Sharad Pawar has come out strongly in support of the Adani Group

follow google news

नवी दिल्ली : “विरोधकांनी एका फर्मने दिलेल्या अहवालाला अधिक महत्त्व दिलं. या फर्मची पार्श्वभूमी कोणालाही माहित नाही, त्यांचं नाव आम्ही कधी ऐकलं नाही. या प्रकरणी एका औद्योगिक समूहाला टार्गेट करण्यात आल्याचं दिसतं आहे”, असं म्हणतं राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अदाणी समूह – हिंडेनबर्ग प्रकरणावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना जोरदार चपराक लगावली आहे. एनडीटीव्ही वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार बोलत होते. (Nationalist Congress Party chief Sharad Pawar has come out strongly in support of the Adani Group)

हे वाचलं का?

अदाणी समूहाबाबत शरद पवार काय म्हणाले?

काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी अदाणी समूहाबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, तुम्ही ज्या लोकांना लक्ष्य करत आहात, त्यांनी काही चूक केली असेल, अधिकारांचा गैरवापर केला असेल तर लोकशाहीत तुम्हाला त्यांच्याविरुद्ध बोलण्याचा १०० टक्के अधिकार आहे, पण काहीही अर्थ नसताना हल्ला करायचा, हे मला समजू शकत नाही. पवार पुढे म्हणाले, “आज पेट्रोकेमिकल क्षेत्रात अंबानींनी योगदान दिले आहे, देशाला त्याची गरज नाही का? विजेच्या क्षेत्रात अदाणी यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. देशाला विजेची गरज नाही का? जबाबदारी स्वीकारून देशाचे नाव उंचावणारे हे लोक आहेत.

हेही वाचा : Adani मुंबईच्या लोकलमध्ये विकायचे वस्तू; वाचा पवारांनी सांगितलेला किस्सा

या उद्योगपतींनी चूक केली असेल, तर तुम्ही हल्ला करा, पण त्यांनी पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत, त्यांच्यावर टीका करणं मला योग्य वाटत नाही. विविध दृष्टिकोन असू शकतात, टीका होऊ शकते. सरकारच्या धोरणांवर ठामपणे बोलण्याचा अधिकार आहे, पण चर्चाही व्हायला हवी. कोणत्याही लोकशाहीत चर्चा आणि संवाद खूप महत्त्वाचा असतो, चर्चा आणि संवादाकडे दुर्लक्ष केल्यास व्यवस्था धोक्यात येईल, ती नष्ट होईल. आपण चुकीच्या मार्गावर जात आहोत. हे आपण समजून घेतले पाहिजे.

संसदीय समिती नेमायला हवी होती का?

या प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती नेमावी, अशी विरोधकांची मागणी होती. पण संयुक्त संसदीय समितीने हा मुद्दा सुटणारा नव्हता. ही समिती नेमली तर देखरेख सत्ताधारी पक्षाकडे असते. ही मागणी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात होती, त्यामुळे चौकशीसाठी नेमलेल्या समितीत सत्ताधारी पक्षाचं बहुमत असेल, तर सत्य कसं बाहेर येईल? हा चिंतेचा विषय आहे. सर्वोच्च न्यायालयावर कोणीही प्रभाव टाकू शकत नाही, त्यांनी चौकशी केली, तर सत्य समोर येण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने चौकशीची घोषणा केल्यानंतर संयुक्त संसदीय समिती चौकशीचे महत्त्व राहिले नाही. संयुक्त संसदीय समिती चौकशीसाठी पुढे जाण्यामागे काँग्रेसचा हेतू काय होता? यावर त्यांचा विश्वास होता का? या प्रश्नांबाबत मी सांगू शकत नाही, परंतु मला माहित आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी नियुक्त केलेली समिती खूप महत्वाची होती.

शरद पवार यांनी राहुल गांधींच्या ‘अदाणी-अंबानी’ या बड्या उद्योगपतींना लक्ष्य करण्याच्या शैलीशी सहमत नसल्याचे स्पष्ट केलं. भूतकाळातील “टाटा-बिर्ला” कथेचा संदर्भ देत ते म्हणाले की “आम्ही राजकारणात प्रवेश केला तेव्हा टाटा-बिर्ला यांच्यावरुन हल्लाबोल करायचो.पण या देशात टाटांचं योगदान किती आहे हे नंतर कळलं. आजकाल टाटा-बिर्ला ऐवजी अदाणी-अंबानींवर हल्ले होत आहेत. अदाणी यांनी ऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, असं म्हणतं त्यांनी अदाणी समुहाचं तोंडभरुन कौतुक केलं.

    follow whatsapp