Raj Thackeray, Mumbai : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित मुंबईत मनसेचा मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडीओ'चा प्रयोग केलेला पाहायला मिळाला. यावेळी ठाकरेंनी पीएम मोदींचं भाषण दाखवलं आहे. या भाषणात नरेंद्र मोदी निवडणूक आयोगाचे दोष सांगताना पाहायला मिळत आहेत. शिवाय, राज ठाकरेंनी शिंदेंच्या दोन आमदारांचा व्हिडीओ दाखवत मतदानातील बोगसपणा समोर आणला.
ADVERTISEMENT
नरेंद्र मोदींचा व्हिडीओ दाखवला
नरेंद्र मोदी या भाषणात म्हणतात, "माझा आग्रह आहे. माझं भाषण तातडीने निवडणूक आयोगाकडे पाठवलं जावं. गुजरातमध्ये शांततापूर्वक निवडणूक होते, त्याचं क्रेडिट निवडणूक आयोगाला जात नाही. महाराष्ट्रात निवडणूक शांततेत होत असेल तर त्याचं क्रेडिट निवडणूक आयागोला जात नाही. बिहार, बंगालमध्ये हिंसा होत नाही, तेव्हा निवडणूक आयोगाला जात. हिंसा रोखण्यासाठी निवडणूक आयोग अपयशी ठरत आहे. आमच्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. संपूर्ण देशाचं मशीन तुमच्या हाती आहे. तुम्हाला एवढे अधिकार आहेत. तुम्हाला माझं बोलणं वाईट वाटत असेल तर आणखी एक गुन्हा दाखल करा. निष्पक्ष पद्धतीने निवडणुका घेणे ही तुमची जबाबदारी आहे. मी गंभीर आरोप करत आहे. लोकशाही अशा पद्धतीने चालत नाही. हे असंच चालू राहाणार का?"
शिंदेंच्या आमदारांचे व्हिडीओ दाखवले
नरेंद्र मोदींचे भाषण दाखवल्यानंतर राज ठाकरे म्हणाले, आम्ही वेगळं काय बोलत आहेत? नरेंद्र मोदींचं हे भाषण गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हाचं आहे. आम्ही देखील निवडणूक आयोगाला सांगत आहोत की, तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम नाहीत. नरेंद्र मोदी तेव्हा म्हणत होते, तेच आम्ही आज म्हणत आहोत. महाराष्ट्रातील नेत्यांची हिंमत कुठंपर्यंत गेली? यांचा आमदार सांगतो मी बाहेरुन मतदार आणले. पैठणच्या आमदारांनी सांगितलं, त्यानंतर शिंदेंनी डोळा मारला. विलास भुमरेंनी वीस हजार मतदार बाहेरुन आणल्याचा दावा केला होता. हा व्हिडीओही राज ठाकरेंनी यावेळी दाखवला. शिवाय, पुढे बोलताना राज ठाकरेंनी यांनी शिंदेंचे आमदार संजय गायकवाड यांचा व्हिडीओ देखील दाखवला. या व्हिडीओमध्ये संजय गायकवाड निवडणूक आयोगाविषयी आणि बोगस मतदानाविषयी भाष्य करताना दिसत आहेत.
महाराष्ट्राच्या मतदार यादीत 96 लाख खोटे मतदार भरलेले आहेत. अशा पद्धतीने निवडणुका होणार असतील निवडणुका कशासाठी लढायच्या? हा संपूर्ण देशातील आणि महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान आहे. मतदान द्या अथवा देऊ नका. मॅच फिक्स झालेली आहे. हे कोणत्याही प्रकारची लोकशाही आहे? आम्ही निवडणूक आयोगला बोललो की सत्ताधारी लोक का चिडत आहेत? आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ताधारी लोक बोलतात. महाराष्ट्रातील गल्ली गल्लीतील लोकांना माहिती आहे की सत्ता कशा प्रकार मिळवली आहे. हीच माणसं विरोधी पक्षात होती, तेव्हा अशीच बोलत होती.
ADVERTISEMENT
