"मग ही आंदोलने तरी कशासाठी करायची?" बँकांमधला खळखट्याक थांबणार, मनसैनिकांना काय आदेश?

मुंबई तक

05 Apr 2025 (अपडेटेड: 05 Apr 2025, 05:53 PM)

Raj Thackeray Letter to MNS Workers : महाराष्ट्रभरातील मनसैनिकांनी राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी आता मनसैनिकांनी हे आंदोलन थांबवायला हरकत नाही असं म्हटलं आहे. 

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज ठाकरे यांचा आंदोलनाला ब्रेक लावण्याचा सल्ला

point

बँकांमधला खळखट्याक थांबणार

point

राज ठाकरे यांनी पत्रामध्ये काय भूमिका मांडली?

Raj Thackeray Letter : "महाराष्ट्राला, मराठी माणासाला आणि मराठी भाषेला विळखा पडतोय. जर तुम्ही इथे महाराष्ट्रात मराठी येत नाही म्हणालात तर कानफाटीतच पडणार. उद्यापासून तयारीला लागा, प्रत्येक बँकेत मराठी वापरतात की नाही ते चेक करा... तयारीला लागा!" हे शब्द होते राज ठाकरे यांचे. राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या पाडव्या मेळाव्याच्या सभेत हा आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर राज्यभरात मनसैनिकांनी वेगवेगळ्या बँक शाखांमध्ये मराठीचा आग्रह धरत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं. काही ठिकाणी मनसैनिकांनी मराठीला विरोध करणाऱ्यांना कानशि‍लातही लगावली होती. मात्र, त्यानंतर आता या आंदोलनाला ब्रेक लावण्याचा सल्ला राज ठाकरे यांनी दिला आहे. 

हे वाचलं का?

महाराष्ट्रभरातील मनसैनिकांनी राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी आता मनसैनिकांनी हे आंदोलन थांबवायला हरकत नाही असं म्हटलं आहे. 

राज ठाकरे यांनी पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं? 

सर्वप्रथम महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जो एक जोरदार आवाज उठवलात त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन.

मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात तुम्हाला आदेश दिला होता की महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहेत की नाही हे पहा, आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँकेच्या प्रशासनाला करून द्या. दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही महाराष्ट्रात सर्वदूर बँकांमध्ये गेलात, तिथे मराठीचा आग्रह धरलात, हे उत्तम झालं; यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहीत धरू शकत नाही हा संदेश जसा गेला, तसंच सर्वदूर असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकद पण दिसली.

हे ही वाचा >> Crime : डोक्यात हातोडा घालून पतीने केली इंजीनियर पत्नीची निर्घृण हत्या! धक्कादायक कारण आलं समोर

पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण या विषयांत पुरेशी जागृती केली आहे, आणि हे घडलं नाही तर काय होऊ शकतं याची चुणूक दाखवली आहे. आता मराठी जनतेनेच आग्रह धरायला हवा आणि आपल्या मराठी समाजानेच जर कच खाल्ली, तर मग ही आंदोलने तरी कशासाठी करायची ?

देवेंद्र फडणवीस यांना काय म्हणाले ठाकरे? 

आणि सगळ्यात महत्वाची जबाबदारी सरकारची आहे. रिझर्व्ह बँकेचा नियम त्यांना माहीत आहे आणि त्या नियमाची अंमलबजावणी 'करून घेणं ही आता सरकारची जबाबदारी आहे. काल कुठेतरी माध्यामांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही. तशी इच्छा आम्हालाही नाही, पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का? तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की.

तूर्तास आंदोलन थांबवा पण...

हे ही वाचा >> 'हा' रिल स्टार आहे तरी कोण? डोंबिवलीच्या सुरेंद्र पाटलाच्या पोलिसांनी नाशिकमधून आवळल्या मुसक्या, नेमकं काय घडलं?
 

त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांनो, तूर्तास आंदोलन थांबवा पण या मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका ! सरकारलाही माझे सांगणे आहे की परत कुठे नियम पाळला जात नसेल, आणि मराठी माणसाला गृहीत धरलं जात असेल, किंवा अपमान केला जात असेल तर पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक त्यांच्याशी चर्चा करायला अवश्य जातील !