ठाणे : 2008 मधील रेल्वे भरती प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आज (दि.11) ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात महत्त्वाची घडामोड झाली. 2008 साली रेल्वे भरतीदरम्यान कल्याण स्थानकावर घडलेल्या मारहाण प्रकरणात ठाण्यातील रेल्वे कोर्टात सुनावणी पार पडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे न्यायालयात हजर राहिल्यानंतर त्यांना न्यायाधीशांसमोर उभे करण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मला हा गुन्हा मान्य नाही.” या संदर्भात न्यायाधीशांनी त्यांना आवश्यक त्या प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करण्यास सांगितले. “आपण सहकार्य करा, आम्ही हे प्रकरण एका महिन्यात निकाली काढू,” असे न्यायाधीशांनी सांगितल्याची माहिती वकील अॅड. ओंकार राजुरकर यांनी दिली.
ADVERTISEMENT
राज ठाकरे कोणत्या प्रकरणात न्यायालयात हजर झाले?
उत्तर भारतीय उमेदवारांवर मनसे कार्यकर्त्यांनी कथितरित्या हल्ले केले आणि रेल्वे मालमत्तेचे मोठे नुकसान केल्याचा आरोप त्या वेळी करण्यात आला होता. या प्रकरणात राज ठाकरे यांच्यासह सात मनसैनिकांवर गुन्हा दाखल झाला होता. “मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांकडे जात आहेत,” या भूमिकेतून राज ठाकरे यांनी परप्रांतीयांचा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित केला होता आणि त्यातून हिंसाचाराला उत्तेजन मिळाल्याचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते.
हेही वाचा : लोकसभेत अमित शाहांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं अन् तुफान राडा, A to Z स्टोरी वाचा आणि क्रोनोलॅाजी घ्या समजून
घटनेनंतर राज ठाकरे व इतर आरोपींना अटकही झाली होती, मात्र नंतर त्यांना दिलासा मिळाला. काही काळ या प्रकरणाची सुनावणी कल्याण न्यायालयात सुरू होती. त्यानंतर हे प्रकरण ठाणे रेल्वे न्यायालयात वर्ग करण्यात आले. सुनावणीदरम्यान वारंवार आरोपी कोर्टात हजर राहत नसल्याने न्यायालयाने त्यांच्यावर नाराजी व्यक्त करत अटक वॉरंटही बजावले होते. नंतर राज ठाकरे यांच्या वकिलांनी अर्ज दाखल करून अटक वॉरंट रद्द करून घेतले.
या सर्व पार्श्वभूमीवर आजची सुनावणी महत्त्वाची ठरली. न्यायालयाच्या सूचनेनुसार राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. सुनावणीत त्यांनी गुन्हा नाकारत न्यायालयीन प्रक्रियेस सहकार्य करण्याची भूमिका मांडली. दरम्यान, उद्या ठाणे रेल्वे न्यायालयात या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. सकाळी 11 वाजता राज ठाकरे स्वतः कोर्टात हजर राहणार असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होऊ शकते, याची दखल घेत पोलिसांनी परिसरात सुरक्षा वाढवली आहे. 2008 च्या रेल्वे भरती प्रकरणाचा निकाल कोणत्या दिशेने झुकतो, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरलेल्या या प्रकरणामुळे उद्याची सुनावणी आणखी महत्त्वाची ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











