कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आज (21 जानेवारी) सर्वात मोठी आणि अत्यंत बुचकळ्यात टाकणारी घडामोड घडली आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट यांचे सर्वाधिक 53 नगरसेवक निवडून आले. तर त्या पाठोपाठ भाजपचे 50 नगरसेवक निवडून आले. खरं तर दोन्ही पक्षांनी युतीत ही निवडणूक लढवली होती. त्यामुळे दोघांचे संख्याबळ लक्षात घेता येथे अगदी सहज सत्ता स्थापन होऊ शकत होती. मात्र, महापौर आपलाच असला पाहिजे यावर घोडं अडलं आणि सत्तेसाठीचा सगळा घोडेबाजार सुरू झाला. मागील 5 दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीत विचित्र राजकीय घडामोडी सुरू असताना आज अचानक मनसेने सगळा डावच पलटून टाकला. ज्या मनसेने कल्याण-डोंबिवलीत प्रामुख्याने भाजप-शिवसेनेविरुद्ध निवडणूक लढवली होती त्याच मनसेने थेट शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला. यामुळे इथे भाजपची मोठी गोची झाली. कारण मनसेच्या पाठिंब्यामुळे शिवसेना शिंदे गटाला त्यांचा महापौर बनवणं सहज शक्य झालं आहे. पण या सगळ्यामुळेच राज ठाकरेंच्या मनसेने पुन्हा एकदा भूमिका बदलली असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
ADVERTISEMENT
'राज ठाकरेंनी दिली ही मुभा, म्हणून शिवसेना-भाजपला पाठिंबा दिला'
कल्याण-डोंबिवलीत मनसेने शिवसेना-भाजपला दिलेला पाठिंबा यासाठी राज ठाकरेंनीच मुभा दिली होती. असं मनसेचे नेते राजू पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. याच थेट अर्थ असा आहे की, पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय हा थेट मनसेच्या हायकमांडकडून आला होता.
हे ही वाचा>> राज ठाकरेंनी मुभा दिली म्हणूनच KDMC मध्ये महायुतीला पाठिंबा, मनसेच्या माजी आमदाराने सगळं सांगितलं
सगळ्यात आधी राजू पाटील नेमकं काय म्हणाले हे आपण जाणून घेऊया...
काही वेळापूर्वीच शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसेने दिलेल्या पाठिंब्याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर मनसे नेते राजू पाटील यांनीही आपली भूमिका स्पष्ट करत माहिती दिली.
राजू पाटील म्हणाले की, 'एकीकडे भाजपचे 50 तर शिवसेनेचे 53 नगरसेवक आहेत. अशा परिस्थितीत केडीएमसीत जो पळवा-पळवीचा खेळ सुरू होता, तो थांबताना आम्हाला दिसत नव्हता. भविष्यात इतर समिती किंवा महत्त्वाच्या टप्प्यांवर गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे एक बाजू स्थिर राहावी, या हेतूनेच आम्ही शिवसेना-भाजपला कल्याण डोंबिवलीमध्ये पाठिंबा दिला आहे.'
हे ही वाचा>> केडीएमसी महापालिकेत ट्वीस्ट! मनसेचा शिवसेनेला पाठिंबा, बंद दाराआड राजकीय खलबतं
ते पुढे म्हणाले, “शिवसेना आणि भाजप यांना समर्थन देत आम्ही एकत्र जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मनसेला काय मिळणार याची चर्चा करण्यापेक्षा सत्तेत असताना आमची कामे झाली की बस झाले, आम्हाला केवळ कामाशी देणे-घेणे आहे. आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत निवडणूक लढलो, मात्र त्यांचे इथले काही नगरसेवक गायब झाले. या सर्व प्रकाराला केडीएमसीतील जनता आता कंटाळली आहे. अंबरनाथची पुनरावृत्ती होऊ नये यासाठीच हा निर्णय घेतला आहे. आणि हा निर्णय स्वतःच्या स्वार्थासाठी नाही.' असं म्हणत राजू पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
तर याविषयी राज ठाकरेंच्या भूमिकेचा उल्लेख करताना राजू पाटील असं म्हणाले की, 'मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार आम्हाला दिले होते. त्या अधिकाराचा वापर करून परिस्थितीचा विचार करत हा निर्णय घेतला आहे. तसेच पाच नगरसेवकांच्या माध्यमातून आम्ही जनतेला न्याय देऊ शकतो का?, हा प्रश्न आमच्यासमोर होता. त्यामुळे केवळ विरोधासाठी विरोध न करता, स्थिर प्रशासन आणि विकासासाठी योग्य तो निर्णय घेणे आवश्यक होते.' असेही मनसे नेते राजू पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
'निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही!', राज ठाकरेंचं ट्वीट
दरम्यान, 16 जानेवारी 2026 रोजी निकाल जाहीर झाल्यावर राज ठाकरेंनी दुसऱ्या एक ट्वीट केलं होतं. पाहा त्यात त्यांनी नेमकं काय म्हटलेलं...
मनसेने भूमिका बदलली का?
राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुकीआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक शहरांमध्ये शिवसेना UBT सोबत युतीत निवडणूक लढवली होती. ज्यामध्ये कल्याण-डोंबिवलीचाही समावेश होता. या संपूर्ण निवडणूक प्रचारात राज ठाकरेंनी शिवसेना-भाजपवर जोरदार टीका केली होती. 'मराठी माणसासाठी ही शेवटची निवडणूक आहे. MMR रिजन तोडण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. इथले सत्ताधारी हे बसवलेले आहेत, ते बसलेले नाहीत त्यामुळे स्वत: निर्णय घेऊ शकत नाही..' अशा स्वरूपाची टीका राज ठाकरेंनी आपल्या जाहीर भाषणांमधून आणि माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमधून गेल्या काही दिवसात अनेकदा केली होती.
दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यांना अवघे काही दिवस होत नाही तोच त्यांनी थेट ज्यांच्याविरोधात ही विधानं केली होती त्यांच्यासोबत सत्तेत जाऊन बसणं पसंत केलं. राजकीय स्थिरता असावी यासाठी आम्ही हा निर्णय घेतला असल्याचं म्हणत मनसे नेते शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेले आहेत. पण ज्या प्रचारावर त्यांनी कल्याण-डोंबिवलीकरांची मतं मिळवली त्या मतदारांना आता मनसे नेमकं काय उत्तर देणार?
मनसे वारंवार भूमिका बदलतं.. या प्रश्नावर राज ठाकरेंनी मुंबई Tak महाचावडीवर काय दिलेलं उत्तर?
मनसे वारंवार भूमिका बदलतं.. याचबाबतचा प्रश्न मुंबई Tak च्या महाचावडीवर राज ठाकरेंना विचारण्यात आला होता. पाहा तेव्हा राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते.
प्रश्न: तुमच्याबाबत असा प्रचार होतो की, मनसे कायम राजकीय भूमिका बदलत जातं, प्रत्येक निवडणुकांमध्ये.. याचा तुम्हाला सर्वाधिक फटका बसतो का मतदानाच्या राजकारणात?
राज ठाकरे: मला साधी गोष्ट सांगा.. पहाटेचा शपधविधी कोणी केला? फडणवीस आणि अजित पवारांनी.. ही भूमिका तीच होती त्यांची आधी? नाही.. ना.. अजित पवारांवर आरोप करणारे.. बैलगाडीभर पुरावे घेऊन जाणारे हे कोण होते? आता फडणवीसांच्या बाजूला उपमुख्यमंत्री म्हणून कोण बसले आहेत? या भूमिकेचं काय करायचं? मी तुम्हाला अशा 500 भूमिका सांगेन भाजपच्या माणसांबद्दलच्या ज्या त्यांनी बदलल्या.. नितीश कुमारबद्दल बदलल्या..
शरद पवारांनी तर पायंडाच पाडला भूमिका बदलण्याचा. मी माझ्या कुठच्या तत्त्वापासून आजपासून दूर झालो? हे सांगा मला.. माझी गोष्ट तू करणारएस,हा करतो बोललाय.. हा चांगलाय.. याने नाही करत.. तू करणारए.. माझ्या त्या तत्त्वांमध्ये काही फरक पडला का?
मैत्री, पक्ष या सगळ्या गोष्टी बाजूला सोडा.. मी मराठीसाठी म्हणून आणि हिंदी सक्तीची यासाठी मी उभा राहिलो ना? तिथे मी वैयक्तिक संबंध जपले का? कोणती भूमिका बदलली. यांनी आतापर्यंत कपडे बदलाव्या तशा भूमिका बदलल्या आहेत त्याचं काय करायचं?
काही लोकं आज इथून.. काँग्रेस.. तिथून भाजप.. त्यांचं काय करायचं? त्यांना तुम्ही कधी प्रश्न विचारत नाही. हे प्रश्न तुम्ही मला का विचारतात?
अजित पवारांची 70 हजार कोटीची भूमिका समजवून घेतो, तुम्ही सावरकर समजून घ्या.. असं सगळं सुरूय. यांना कोणाला सावरकर समजले आहेत का? यांनी किती सावरकर वाचले आहेत याबाबत शंकाच आहे मला. म्हणजे सर्वात मोठं भांडण किंवा वाद.. हा मला असं वाटतं की, आरएसएस किंवा सावरकरांबद्दलच होता ना.. हे आता कधीपासून सावरकरांबद्दल बोलू लागले?
सरसंघचालक गोळवलकर यांना जेलमध्ये टाकण्याचं काम कोणी केलं.. वल्लभभाई पटेल, आरएसएसवर बंदी आणण्याचं काम कोणी केलं होतं.. वल्लभभाई पटेल.. त्यांचा पुतळा बांधलाय गुजरातमध्ये.
प्रश्न असा आहे की, प्रत्येक वेळेस राजकीय सोयीने या सगळ्या गोष्टी, भूमिका बदलत हे आजपर्यंत ही सगळी लोकं एकत्र आली आणि प्रश्न मला तुम्ही विचारताय? असं उत्तर राज ठाकरेंनी मुंबई Tak च्या महाचावडीवर दिलं होतं.
त्यांच्या या उत्तराला आता काही दिवसही उलटत नाही तोच मनसेने शिवसेना-भाजपसोबत कल्याण-डोंबिवलीमध्ये थेट सत्तेत बसण्याची तयारी केली आहे.
ADVERTISEMENT











