Ind vs NZ : कानपूर कसोटी रंगतदार अवस्थेत, भारताकडे ६३ धावांची आघाडी, अक्षर पटेलचे ५ बळी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला कानपूर कसोटी सामना आता रंगतदार अवस्थेत आला आहे. तिसऱ्या दिवसाअखेरीस भारतीय संघाकडे दुसऱ्या डावात ६३ धावांची आघाडी असून त्यांनी शुबमन गिलच्या रुपात एक महत्वाची विकेट गमावली आहे. पहिल्या दिवशी एकही विकेट न गमावलेल्या न्यूझीलंडला भारतीय बॉलर्सनी पहिल्या डावात २९६ रन्समध्ये गुंडाळलं. दुसऱ्या दिवसाअखेरीस न्यूझीलंडने एकही विकेट न गमावता शतकी धावसंख्येचा टप्पा […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:29 AM • 27 Nov 2021

follow google news

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला कानपूर कसोटी सामना आता रंगतदार अवस्थेत आला आहे. तिसऱ्या दिवसाअखेरीस भारतीय संघाकडे दुसऱ्या डावात ६३ धावांची आघाडी असून त्यांनी शुबमन गिलच्या रुपात एक महत्वाची विकेट गमावली आहे. पहिल्या दिवशी एकही विकेट न गमावलेल्या न्यूझीलंडला भारतीय बॉलर्सनी पहिल्या डावात २९६ रन्समध्ये गुंडाळलं.

हे वाचलं का?

दुसऱ्या दिवसाअखेरीस न्यूझीलंडने एकही विकेट न गमावता शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडला होता. बिनबाद १२९ वरुन तिसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात केल्यानंतर विल यंग आणि टॉम लॅथम यांनी काही षटकं खेळून काढली. तिसऱ्या दिवशी दोघांमध्येही छोटेखानी भागीदारी झाल्यानंतर आश्विनने यंगचा अडसर दूर केला. यंदने २१४ बॉलमध्ये १५ चौकार लगावत ८९ धावा केल्या. यानंतर न्यूझीलंडच्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही.

कर्णधार केन विल्यमसन, रॉस टेलर, हेन्री निकोल्स हे सर्व अनुभवी फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत राहिले. अक्षर पटेलने भारताला मोक्याच्या क्षणी महत्वाचे बळी मिळवून दिले. अखेरच्या फळीत टॉम ब्लंडेल आणि काएल जेमिन्सन यांनी मैदानावर तग धरत भारतीय बॉलर्सचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. भारतीय गोलंदाजांनी एकाही न्यूझीलंडच्या जोडीला भागीदारी करण्याची संधी न देता पहिला डाव २९६ धावांवर संपवला.

पहिल्या डावात भारतीय संघ ४९ धावांची आघाडी घेण्यात यशस्वी झाला. भारताकडून अक्षर पटेलने ५ तर रविचंद्रन आश्विनने ३ तर उमेश यादव आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

दुसऱ्या डावात भारतीय संघानेही सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. परंतू काएल जेमिन्सनने शुबमन गिलचा बचाव भेदत त्याला क्लिन बोल्ड केलं. अखेरच्या क्षणांमध्ये मोठा धक्का बसल्यामुळे भारतीय संघ बॅकफूटवर फेकला गेला. परंतू यानंतर चेतेश्वर पुजारा आणि मयांक अग्रवाल या जोडीने अखेरच्या सत्रातली काही षटकं खेळून काढत अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली.