Maharashtra@61: मराठी तरूणाईच घडवेल नवा महाराष्ट्र

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राचा आणि मराठीपणाचा अभिमान बाळगणाऱ्या सगळ्यांना शुभेच्छा. 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. माझा जन्म 1959 मधला, त्यामुळे आमच्या पिढीचा प्रवास हा महाराष्ट्रासोबतच झाला असं म्हणायला हरकत नाही. मी कवितांच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांमध्ये फिरलो आहे. तो महाराष्ट्र आम्ही अनुभवला आहे, बघितला आहे. महाराष्ट्राबाबत पुष्कळ वाचनही करायला मिळालं. सजग पद्धतीने सगळ्या क्षेत्रांकडे बघणं आणि अंतर्मुख होऊन आपणच आपली चिकित्सा करणं आपण आज कुठे आहोत, काल कुठे होतो आणि आपल्याला कुठे जायचं आहे हे शोधणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यानिमित्ताने माझे काही विचार मांडतो आहे.

Maharashtra@61 : जाणून घ्या काय म्हणत आहेत ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर ?

महाराष्ट्राने राजकारणात स्वाभिमान दाखवला आहे. मात्र राष्ट्रीय राजकारणात अगदी यशवंतराव चव्हाण यांच्यापासून जे दुय्यम स्थान महाराष्ट्राने पत्करलं ते पत्करलं. ते का घडलं ते ठाऊक नाही. पण आपल्यासारख्या माणसाला हे वाटतं की सर्व प्रशासकीय जाण असलेला आणि महाराष्ट्राची नस ठाऊक असलेला मराठी माणूस महाराष्ट्राचा पंतप्रधान का झाला नाही? हा प्रश्न पडतोच. 61 वर्षांमध्ये ही गोष्ट घडली नाही. ज्यांच्याबाबतीत ही शक्यता होती त्यांनी त्यांच्या अनुयायांनी याबाबत अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे असं मला वाटतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात सहकार चळवळीला प्राधान्य देण्यात आलं ते रास्तच होतं. पण पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखान्यांचं जाळं उभं करून जी भरभराट साधली गेली. मात्र विदर्भात संत्र्यांच्या किंवा कापसाच्या उत्पादनाच्या आधारावर तसे उद्योग उभे राहिले नाहीत. विकासाचा अनुषेश वाढत गेला. राज्यात कुठेतरी असमतोल निर्माण झाला. अनेक तज्ज्ञ लोक असं म्हणतात की नंदुरबार, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ यासारखे जे जिल्हे आहेत तिथे नक्षलवादी वातावरण पसरलं ते कशामुळे पसरलं त्याचाही विचार व्हायला हवा. त्यांच्यावर कारवाई तर केलीच पाहिजे. निरपराध लोकांना त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतं, त्यांच्या हत्या होतात, त्याला विरोध आहेच पण या चळवळी निर्माण का झाल्या याचा विचार होणं गरजेचं आहे.

आपले राजकीय नेते कायम असं म्हणतात की हा शाहू, फुले,आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. यामध्ये चूक असं काहीही नाही अगदी योग्यच आहे. हा वीर सावरकारांचा, आगरकारांचा, लोकमान्य टिळकांचा, प्रबोधनकार ठाकरेंचा महाराष्ट्र आहे. डॉ. पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापासून ते अगदी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम राज्यभरात पोहचवणाऱ्या नरेंद्र दाभोलकरांपर्यंतच्या सगळ्यांचाच हा महाराष्ट्र आहे. अशी अनेक नावं घेता येतील ज्यांनी महाराष्ट्र पुरोगामी कसा होईल ते पाहिलं. मात्र याच राज्यात डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांची हत्या होते आणि त्यांचे मारेकरी सापडत नाहीत हे काय आहे ? असा प्रश्न माझ्यासारख्या माणसाला पडतो.

ADVERTISEMENT

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? हे फक्त राज्यकर्त्यांपुरतं मर्यादित नाही. आपण सगळेच जबाबदार आहोत असं मला वाटतं. जनता, नेते आणि समाजसुधारक यांचं जे काही अंतर्गत संबंधाचं गणगोत होतं ते पूर्वी.. पण त्यांच्यात मतभेद होते तरीही संवाद संपलेला नव्हता. आजची परिस्थिती तशी दिसत नाही. गेल्या पंधरा ते वीस वर्षांमध्ये जातीयवाद प्रचंड वाढीला लागला आहे. खासकरून महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांमध्ये खूप वाढलं आहे. काहीही बदल होणार नाही अशा प्रकारची मनस्थिती समाजासाठी धोकादायक आहे. तरूणाईच्या मनातले लपवून ठेवलेले सुरुंगच आहेत हे.. ही मानसिकता महाराष्ट्र ६१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पाहण्यास मिळते आहे. राज्यातल्या सुबुद्धांनी यावर वेळीच विचार केला पाहिजे आणि यातून काय मार्ग काढता येईल ते पाहिलं पाहिजे नाहीतर काय होऊ शकतं याची झलक आज दिसते आहे. ध्रुवीकरण होऊ लागलं आहे आणि छोट्या मोठ्या कारणावरून राड्याच्या नव्या पद्धती सुरू झाल्या आहेत.

ADVERTISEMENT

मुंबईसारख्या राजधानीत अतिगरीब आणि अतिश्रीमंत असे दोनच वर्ग आढळून येतील. महाराष्ट्र राज्यांची निर्मिती झाली होती तेव्हा मुंबईमध्ये मराठी भाषिकांचा टक्का 50 ते 55 टक्के होता. 2020 मध्ये तो 20 टक्के इतका कमी झाला आहे. हा टक्का का घसरला याचा विचार होणं गरजेचं आहे. ही सगळी प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. या परिस्थितीला मराठी लोकही जबाबदार आहेत. नुसतंच जय महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र, बहु असोत सुंदर अशी गाणी म्हणून काही होणार नाही. ही गाणी म्हटली पाहिजे त्याने जोश येतो पण त्याने साध्य काही होत नाही. मराठी लोकांचा आवाज त्याने ऐकला जाईल अशी स्थिती नाही.

Maharashtra@61 : कायदेतज्ज्ञ आणि लेखक नरेंद्र चपळगावकर सांगत आहेत महाराष्ट्रातले बदल

आज घडीला मराठी शाळा या धडाधड बंद होत आहेत. हे बंद करणारे लोक कोण आहेत? ते अमराठी आहेत की मराठीच लोक आहेत याचाही विचार केला गेला पाहिजे. मराठी मराठी असा घोष करून उपयोग नाही त्यासोबत उद्योगाची जोड हवी. नुसत्या वडा-पावच्या गाड्या टाकून चालणार नाही. सगळ्या उद्योगाच्या क्षेत्रामध्ये मराठी माणूस दिसला पाहिजे. ज्याला आर्थिक सक्षमता नसते त्याचा आवाज नेहमीच दबलेला असतो. अमुक हुतात्मे झाले वगैरे हे कुणीही बदललेल्या जागतिक स्थितीत कुणी ऐकून घेत नाही. बदल झालेली ही आर्थिक, सामाजिक समीकरणं लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीने जर यामध्ये आपलं स्वतःचं डोकं लावून सुधारणा केली नाही तर मराठी माणसाचा कोंडमारा संपणार नाही असं मला इतक्या वर्षांचं चित्र पाहून वाटतं आहे. कुणीही प्रेषित किंवा नेता आपल्या मदतीला येणार नाही ते आपल्यालाच केलं पाहिजे.

शिक्षण आणि आरोग्य या दोन सेवा यासाठी महाराष्ट्राने शेवटचं स्थान दिलं, ज्याचे परिणाम आज दिसत आहेत. कोरोनोत्तर काळात महाराष्ट्र कसा उभा राहिल आणि १ मे १९६० रोजी जसा महाराष्ट्राचा आवज बुलंद होता तो तसाच राहिल हे पाहणं गरजेचं आहे. अभिमानाने आपल्याला सांगता आलं पाहिजे की कोरोनानंतरही आम्ही ताठ आहोत, खंबीर आहोत. प्रगतीचा अश्व अटकेपार नेऊ असं आत्मविश्वासाने म्हणण्याची संधी आपणच निर्माण करण्याची गरज आहे. मराठी माणूस त्याच्यात असलेली रग, जिद्द यांच्या जोरावर या संकटावर मात करेल. या सगळ्या परिस्थितीतून वाट काढून तो सांगणार की होय मी मराठी आहे आणि महाराष्ट्र माझा आहे. जय महाराष्ट्र!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT