
साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या तिघांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. नागपूरवरुन मुंबईच्या दिशेने जाणारी खासगी ट्रॅवल्स आणि चाळीसगाव वरुन यवतमाळमधील डिग्रस येथे जाणारी खासगी ऑल्टो गाडीचा 23 एप्रिलला पहाटे 3 वाजल्याच्या सुमारास भीषण अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सैनी नावाची खासगी ट्रॅवल्स आणि ऑल्टो कार यांची समोरासमोर धडक झाली. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की ऑल्टो गाडीतून प्रवास करणाऱ्या 5 जणांपैकी तिघांचा जागेवरच मृत्यू झाला.
या अपघातात जखमी झालेल्या दोघांना बुलढाणा येथे उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. ऑल्टो गाडीतले प्रवासी हे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. या अपघातात इंदल चव्हाण, योगेश विसपुते आणि विशाल विसपुते यांचा मृत्यू झाला आहे.
याचसोबत ज्ञानेश्वर चव्हाण आणि मिथुन चव्हाण या दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत.