Maratha Reservation : भुजबळांचं नाव ऐकताच जरांगे चिडले, मग वाटेल ते बोलले
मनोज जरांगे पाटील आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वैर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा भुजबळांना लक्ष्य करताना पातळी सोडली.
ADVERTISEMENT

– इसरार चिश्ती, छत्रपती संभाजीनगर
Manoj Jarange Patil Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून ते सरकारमधील मंत्र्यांनी मध्यस्थी करूनही मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ वाद शांत होण्याची चिन्हे नाहीत. दोन्हींकडून शब्दांचे बाण डागले जाताहेत. त्यातच आता मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा भुजबळांवर हल्ला चढवला. भुजबळांबद्दल प्रश्न येताच चिडलेल्या जरांगेंनी मनात येईल ते बोलून संताप व्यक्त केला.
जरांगे भुजबळांबद्दल काय काय बोलले?
छगन भुजबळांबद्दल प्रश्न विचारताच जरांगे म्हणाले, “ते पागल झालं आहे. त्याला काय करावं तेच कळेना. मराठे ओबीसीत येऊ नये, असे त्याला वाटते, पण नेमके 54 लाख मराठे ओबीसीत येऊन बसले आहेत. आता आठ-दहा दिवसांत अडीच कोटींपेक्षा जास्त मराठे ओबीसी आरक्षणात जातील. त्या आधारावर. त्याचा प्रॉब्लेम उलटा होऊन बसला आहे. त्याचा दुसरा एक प्रॉब्लेम आहे की, गाव-खेड्यातील ओबीसी बांधवांना काय वाटतं, मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या नसत्या तर आपण त्यांना विरोध केला असता. पण, त्यांचं सगळं सापडलं. कायद्याच्या चौकटीत आहे. त्यांना घेऊच नका असे आपले नेते कसं काय म्हणताहेत.”
हेही वाचा >> काँग्रेसला मोठा झटका! सुनील केदार यांची आमदारकी रद्द
भुजबळांवर टीका करताना जरांगे इथेच थांबले नाही. ते पुढे म्हणाले, “खेड्यातील ओबीसींना वाटतं की, गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना मिळायला पाहिजे. कारण त्यांच्या नोंदी सापडल्यात. खऱ्याला खरं म्हणणारे गावखेड्यात लोक आहेत, पण तो त्यात मोडत नाही. खोटं रेटून बोलायची सवय असल्यामुळे ते पूर्ण आरबळून (गोंधळून) गेलं आहे. त्याला काय करावं ते कळेना. मला त्याला इथून पुढे महत्त्व सुद्धा द्यायचं नाही. ते पूर्ण पागल झालं आहे”, अशी टीका करत त्यांनी भुजबळांवर प्रहार केला.










