Manoj Jarange : भुजबळांचा घणाघात, जरांगे पाटलांच उत्तर; म्हणाले, “कितीही कळप…”
Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal : मनोज जरांगे पाटील यांची सांगलीत सभा झाली. जरांगेंनी पुन्हा एकदा ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली.
ADVERTISEMENT

Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली अंबड शहरात ओबीसी मेळावा पार पडला. या मेळाव्यात अरे तुरे करत भुजबळांना मनोज जरांगे पाटलांवर टीकेचा घणाघात केला. यावेळी ओबीसी समाजातील वेगवेगळ्या पक्षातील नेते या मेळ्यावाला हजर होते. या मेळाव्यानंतर सांगलीत मनोज जरांगे यांची सभा झाली. या सभेच जरांगे ओबीसी मेळाव्याचा उल्लेख न करता पलटवार केला. ओबीसी मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या विविध जातीतींना कळप असं संबोधत जरांगे पाटलांनी उत्तर दिलं.
मनोज जरांगे पाटील सध्या काही जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी म्हणजे १७ नोव्हेंबर रोजी जरांगे पाटलांची सांगलीत सभा झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “चारही बाजूने मराठ्यांना सगळ्यांनी घेरलं आहे. आपल्याला ते षडयंत्र तोडून काढायचं आहे. ही जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर आहे. सावध व्हा, गाफील राहू नका. वेढा चौहीबाजूने पडला आहे. ७० वर्षांपासूनचा वेढा तोडायचा आहे. आता एकजूट दाखवण्याची गरज आहे. एकत्र या. ज्यांना आरक्षण असेल आणि ज्यांना नसेल अशा दोन्ही मराठा बांधवांनी एकत्र यावं. कारण, आता बिगर कामाचे कळप एकत्र यायला लागले आहेत.”
हे ही वाचा >> ‘मराठा समाजावर तुम्ही…’, गोपीचंद पडळकरांचा नाव न घेता पवारांवर हल्लाबोल
“कितीही कळप एकत्र येऊद्या, या राज्यात ५०-६० टक्के मराठा आहे. टेन्शन घ्यायचं काम नाही. सांगलीतून एकच आवाहन आहे की मराठा समाजाने जात वाचवणं गरजेचं आहे. त्यामुळे आरक्षण असलेल्या आणि नसलेल्या मराठा समाजाने उद्यापासून आरक्षण मिळेपर्यंत ताकदीने एकजूट दाखवा”, असं आव्हान जरांगे पाटलांनी यावेळी केलं.
“आपल्यावर जातीला टाकलेला वेढा तोडायची जबाबदारी”
“आपल्याला आव्हान पेलायचं आहे. स्वतःच्या लेकराच्या हितासाठी, त्याला मोठं करण्यासाठी आपल्याला आव्हान पेलायचं आहे. आपली जात उद्ध्वस्त होता कामा नये. पोरांचं भवितव्य उद्ध्वस्त होता कामा नये. जातीवर रचलेले षडयंत्र आणि टाकलेला वेढा तोडायची जबाबदारी तुमच्यावर आजपासून आहे”, असं जरांगे पाटील उपस्थितांशी बोलताना म्हणाले.