पंढरपूर : काळ्या धाग्यामुळे उघडकीस आले हत्याकांड, ऐश्वर्या मिसिंग असल्याची तक्रार आरोपीनेच दिली
Pandharpur Crime : पंढरपुरात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावली आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तांत्रिक तपासापुढे आरोपीचा बनाव टिकला नाही.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पंढरपूर : काळ्या धाग्यामुळे उघडकीस आले हत्याकांड
ऐश्वर्या मिसिंग असल्याची तक्रार आरोपीनेच दिली
पंढरपूर तालुक्यात एका अत्यंत धक्कादायक आणि क्रूर घटनेने खळबळ उडाली आहे. ज्या पतीवर पत्नीने आयुष्यभर सोबत राहण्यासाठी विश्वास ठेवला, त्याच पतीने केवळ संशयापोटी आपल्या अर्धांगिनीचा अंत केल्याचे उघड झाले आहे. ऐश्वर्या सरवदे खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून, हा केवळ हत्येचा गुन्हा नसून पुराव्यांची विल्हेवाट लावून पोलिसांची दिशाभूल करण्याचा एक मोठा कट होता. 12 मार्च 2026 रोजी पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील पुलाखाली पोलिसांना एका महिलेचा नग्न आणि पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. गुन्हेगाराने ओळख पटू नये म्हणून मृतदेह नग्न अवस्थेत टाकला होता, जेणेकरून हे लैंगिक अत्याचाराचे प्रकरण वाटावे, असा बनाव त्याने रचला होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या क्रूर हत्याकांडाचे सत्य समोर आले आहे.
हेही वाचा : डोंबिवलीतील कुख्यात रील स्टारचा काळा कारनामा उघड,12 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणाचा उलगडा
दिशाभूल करण्यासाठी रचला बनाव; व्हॉट्सॲप स्टेटसने दिला इशारा
एकीकडे पोलीस या अज्ञात मृतदेहाचा तपास करत असतानाच, पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात 29 वर्षीय ऐश्वर्या सरवदे बेपत्ता असल्याची तक्रार तिचा पती हरी सरवदे यानेच दाखल केली होती. 9 मार्चपासून ऐश्वर्या बेपत्ता असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते, मात्र उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. प्रशांत डगळे यांना हरीच्या बोलण्यात विसंगती जाणवू लागली. तांत्रिक पुराव्यांची तपासणी केली असता 9 मार्च रोजी ऐश्वर्याचा मोबाईल एक तास बंद असल्याचे आणि त्यानंतर हरीनेच तिचा मोबाईल सुरू करून 'वॉटर पार्कला जात आहे' असा व्हॉट्सॲप स्टेटस ठेवल्याचे समोर आले. हा सर्व प्रकार पोलिसांचे लक्ष विचलित करण्यासाठी आणि ऐश्वर्या स्वतःहून निघून गेल्याचे भासवण्यासाठी हरीने रचलेला एक सुनियोजित डाव होता.
हत्येनंतर मृतदेह घरातच लपवला; मुलांपासून लपवून केली विल्हेवाट
चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, 9 मार्च रोजी हरीने चारित्र्याच्या संशयावरून ऐश्वर्याचा गळा दाबून खून केला होता. क्रूरतेची सीमा ओलांडत त्याने मृतदेह लपवण्यासाठी तो एक दिवस घरातच ठेवला आणि आपल्या लहान मुलांना काही कळू नये म्हणून तो त्यांना घराबाहेर घेऊन जात असे. त्यानंतर त्याने मृतदेह एका ठिकाणी पुरला आणि पुन्हा तिथून काढून पोत्यात भरून गुरसाळे परिसरात नेऊन टाकला. मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्याने त्याची ओळख पटवणे अशक्य झाले होते, मात्र गुन्हेगार कितीही हुशार असला तरी काही ना काही पुरावा सोडतोच, या म्हणीप्रमाणे ऐश्वर्याच्या शरीरावरील दागिने आणि एका काळ्या धाग्याने या तपासाला नवीन दिशा दिली.









