Monsoon Update: मुंबईसह अनेक जिल्ह्यांना 'येलो अलर्ट' पण नेमका कशाचा?
मान्सूनची आगेकूच मंदावली असून महाराष्ट्रात पुढील तीन दिवस उष्णतेचा तडाखा बसणार आहे. त्यामुळे जून महिन्यात देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची वाटचाल मंदावल्याचे चित्र दिसत असतानाच आता बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला पुन्हा गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र महाराष्ट्रासाठी अद्यापही फारसे पोषक वातावरण तयार झालेले नसल्याने राज्यातील अनेक भागांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते.
बंगालच्या उपसागरातील प्रणालीमुळे मान्सूनला मिळणार चालना
हवामानातील घडामोडींनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामान तज्ज्ञांचे मत होते की, उपसागरात कोणतीही प्रभावी प्रणाली निर्माण झाल्याशिवाय मान्सून पुढे सरकणार नाही. आता ही प्रणाली तयार होत असल्याने मान्सूनच्या पुढील प्रवासाला मदत होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा>> Maharashtra Weather : राज्यात धो धो पाऊस कोसळणार, 'या' 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट
दुसरीकडे, अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत होते. मात्र सध्या राज्याच्या किनारपट्टी भागात ढगांची विशेष गर्दी किंवा कमी दाबाचे क्षेत्र दिसून येत नसल्याने महाराष्ट्रातील मान्सूनची प्रगती काहीशी संथ झाली आहे.
महाराष्ट्रात मान्सूनची आगेकूच ठप्प
महाराष्ट्रात मान्सूनने दक्षिणेकडील काही भाग व्यापले असले तरी गेल्या दोन ते तीन दिवसांत त्याने विशेष प्रगती केलेली नाही. मुंबईसह मध्य महाराष्ट्रात मान्सून 10 ते 12 जूनदरम्यान पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात त्याची वाटचाल मंदावल्याने आता मुंबईसह राज्याच्या इतर भागांमध्ये मान्सून 15 ते 16 जूनच्या सुमारास दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.









