पालघरला पावसाने झोडपलं, जनजीवन विस्कळीत; शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर
पालघरमध्ये कालपासून धुवांधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे. या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी, खासगी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा तसेच महाविद्यालयांना अधिकृत सुट्टी जाहीर केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पालघरला पावसाने झोडपलं
जनजीवन विस्कळीत
शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर
Weather Update : पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे आणि भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अलर्टच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील वाढता पाऊस आणि संभाव्य धोका लक्षात घेता, जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने 24 जुलै (शुक्रवार) रोजी जिल्ह्यातील सर्व सरकारी, खासगी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा तसेच महाविद्यालयांना अधिकृत सुट्टी जाहीर केली आहे.
शाळा, कॉलेजेसना सुट्टी
जिल्ह्यात ठिकठिकाणी होत असलेली अतिवृष्टी, रस्त्यांवर साचलेले पाणी आणि निर्माण झालेली पूरसदृश परिस्थिती यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच, नागरिकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून कोणत्याही अत्यंत महत्त्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर पडू नये आणि आपत्ती व्यवस्थापन व स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
हे ही वाचा : Sonam Wangchuk यांनी उपोषण सोडलं पण अभिजीत दिपकेंचा प्रचंड मोठा निर्णय, सगळं राजकारणच पलटलं!
मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या 24 तासांत पालघर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार आणि काही भागांत अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या हवामानाच्या इशाऱ्यामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले असून, कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व यंत्रणा आणि शोध-बचाव पथके 24 तास 'अलर्ट मोड'वर ठेवण्यात आली आहेत.
हे ही वाचा : ‘Friends हा काही मामूली विषय नाही..’, PM मोदींनी रात्री उशिरा शेअर केला VIDEO; पण…
दक्षता बाळगण्याचे निर्देश
अतिवृष्टीमुळे नद्या, नाले आणि सखल भागांत पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्याने किनारपट्टी व नदीकाठच्या रहिवाशांना विशेष दक्षता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्थानिक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून, नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
