दारुचं व्यसन अन् लग्नही ठरेना, रत्नागिरीतील 32 वर्षीय दिव्यांग तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Ratnagiri news : दारुचं व्यसन अन् लग्नही ठरेना, रत्नागिरीतील 32 वर्षीय दिव्यांग तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दारुचं व्यसन अन् लग्नही ठरेना
रत्नागिरीतील 32 वर्षीय दिव्यांग तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
देवरुख : दारूचं व्यसन, शारीरिक दिव्यांगत्व आणि लग्न ठरत नसल्याचं नैराश्य... या सगळ्या समस्यांनी त्रस्त झालेल्या एका तरुणाने शेवटी स्वतःचं आयुष्य संपवलं. संगमेश्वर तालुक्यातील वांद्री कुणबीवाडी येथे ही हृदयद्रावक घटना घडली असून, आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव मकरंद कृष्णा पाल्ये (वय 32) असं आहे. 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 1.30 वाजण्याच्या दरम्यान त्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मकरंद पाल्ये हा जन्मतःच दिव्यांग होता. त्याचा एक पाय दुसऱ्या पायापेक्षा लहान असल्यामुळे तो नेहमी चालताना अडखळत असे. यामुळे त्याच्या विवाहाची चर्चा गावात अनेकदा झाली, पण प्रत्यक्षात कुठलाच प्रस्ताव पुढे आला नाही. या कारणामुळे तो सतत खिन्न राहायचा. त्यातच गेल्या काही वर्षांपासून त्याला दारूचे व्यसन लागले होते. दारूच्या आहारी गेलेला मकरंद यामुळे अधिक एकाकी झाला होता. घरच्यांच्या वारंवार समजावण्यानंतरही तो आपलं व्यसन सोडू शकला नाही.
गेल्या काही दिवसांपासून तो अधिकच नैराश्यग्रस्त झाला होता. त्याच्या शेजाऱ्यांनीही त्याच्यातील बदल ओळखला होता, मात्र त्याने कोणीचं ऐकलं नाही. शनिवारी सकाळी घरातील सदस्य काही वेळ बाहेर गेले असताना, मकरंदने घरातील लोखंडी रॉडला नायलॉनची दोरी बांधली आणि गळफास घेतला. काही तासांनंतर घरच्यांना आणि शेजाऱ्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना कळविलं. संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला आणि तो शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. प्राथमिक तपासात आत्महत्येचं कारण नैराश्य आणि दारूचं व्यसन असल्याचं स्पष्ट झालं आहे.










