Shiv sena UBT : “अदानींनी मिंधे, पवारांसह पन्नासएक आमदार-खासदारांना…”
uddhav thackeray dharavi redevelopment project : अदाणींना मिळालेल्या धारावी पुनर्वसन प्रकल्पावरून उद्धव ठाकरे आक्रमक झालेत. सामना अग्रलेखातून विरोधाची भूमिका स्पष्ट करताना उद्धव ठाकरे यांनी मोदी-शाह, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सवाल केले आहेत. वाचा नेमकं काय म्हटलं आहे.
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray on Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्वसन प्रकल्पाला काँग्रेससह शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरोध सुरू केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आल्यानंतर भाजपकडून थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य करण्यात आले. भाजपकडून झालेल्या या हल्ल्याला सामना अग्रलेखातून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. यात राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरही अप्रत्यक्षपणे बाण डागले आहेत.
धारावी पुनर्वसन प्रकल्प, अदाणी आणि शिंदे-भाजपला सवाल… अग्रलेखात काय?
“गौतम अदानी यांच्याशी भारतीय जनता पक्षाचे नेमके नाते काय हे त्यांनी एकदा जाहीर केले पाहिजे. या नात्याविषयी लोकांच्या मनात शंका आणि संभ्रम आहे. हे नाते नैतिक की अनैतिक यावरही खुलासा व्हायला हवा. हे महाशय टाटा, बिर्ला, बजाज, अझिझ प्रेमजी, नारायण मूर्ती नाहीत. उद्योगपती व शेठजी यात फरक आहे.”
– “अदानी हे मोदीकृत भाजपचे नाजूक जागेचे दुखणे असावे हे तर नक्कीच. कारण विरोधकांनी अदानी यांच्या एखाद्या उपद्व्यापाबाबत प्रश्न उपस्थित करताच भाजपचे तांडव सुरू होते. त्यांच्या अंगात आग्यावेताळ संचारतो व प्रश्नकर्त्यांच्या अंगावर ते हमरीतुमरी करत धावून जातात. हेच आता धारावी पुनर्वसन प्रकल्पाबाबतीतही दिसून आले.”
– “धारावी पुनर्वसन विकासकामाचे ‘टेंडर’ अदानी यांच्या कंपनीने मिळवले आहे. आशियामधील सगळ्यात मोठ्या घनदाट झोपडपट्टीचा विकास होत असेल व गोरगरीबांना त्यांच्या हक्काची घरे मिळणार असतील तर त्यास कोण विरोध करेल? विरोधाचा प्रश्नच उद्भवत नाही. पण साधारण सहाशे एकरांचा भूखंड अदानी यांच्या आधीच फुगलेल्या खिशात घालताना मिंधे-फडणवीस सरकारने अदानींशी एक प्रकारे ‘मुंबई’चाच सौदा केला. धारावी विकासाच्या नावाखाली संपूर्ण मुंबईच ‘हुंडा’ म्हणून या भाजपच्या जावयास देण्याचा घाट घातला.”
“अदानींचे भाजपशी नाते काय आहे?”
– “अदानींना मुंबई गिळू देणार नाही असा दम भरताच भाजपवाले अदानींचे वकील म्हणून भांडण्यास उभे राहिले. त्यामुळेच प्रश्न पडला अदानींचे भाजपशी नाते काय आहे? धारावीतील साधारण बारा लाख लोकांना घरे मिळावीत, पण त्यातील नागरिकांना पात्र-अपात्र ठरविण्याचा अधिकार पूर्णपणे अदानींचा आहे. 300 चौरस फुटांचे घर अदानी देणार, पण त्यांना 500 चौरस फुटांचे घर मिळायला हवे. धारावीत गार्मेंट, चर्मोद्योग, प्लॅस्टिक, कुंभारकामाचे उद्योग आहेत. हे तसे लघुउद्योग आहेत. खाद्यपदार्थ, पापड-लोणची बनवणाऱ्या महिलांचे गट तेथे काम करतात. त्या सगळय़ांच्या व्यवसायांना ते आहेत तेथेच जागा मिळायला हव्यात ही मागणी न्याय्य आहे व या मागणीबद्दल आवाज उठवताच भाजप आणि त्यांचे मिंधे लोक अदानींचा जयजयकार करीत तांडव करीत आहेत.”