Chetan Singh : “हिंदुत्व धोक्यात’ची भीती”, चौघांची हत्या करणाऱ्या जवानाच्या पत्नीने काय सांगितलं?
Jaipur-Mumbai Express Firing Latest News : जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये चेतन कुमार सिंह या आरपीएफ जवानाने तीन प्रवाशी आणि रेल्वेच्या एका वरिष्ठ जवानाची गोळ्या घालून हत्या केली होती. याप्रकरणात त्याच्या पत्नीने चक्रावून टाकणारे खुलासे केले आहेत.
ADVERTISEMENT

–शिवकुमार तिवारी, मुंबई
Jaipur Mumbai Train Shooting in Marathi : जयपूर-मुंबईकडे येणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये चार प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना 31 जुलै रोजी घडली होती. रेल्वे संरक्षक दलाचा जवान चेतन कुमार सिंह याने धावत्या गाडीतच तीन मुस्लीम व्यक्तींसह आरपीएफचे वरिष्ठ सहाय्यक उपनिरीक्षक टिकाराम मीणा यांना गोळ्या घातल्या होत्या. या प्रकरणात आता चेतन कुमार सिंहच्या पत्नीने चक्रावून टाकणारा खुलासा केला आहे. “हिंदुत्व धोक्यात आल्याची भीती वाटत होती. मानसिक आजारी असल्याने ही घटना घडली, असे त्यांनी म्हटले आहे.
चेतन कुमार सिंहची पत्नी प्रियांकाने सांगितले की, “गोळीबाराची घटना घडली, त्याच्या आधीपासूनच त्याची (आरपीएफ जवान चेतन कुमार सिंह) मानसिक स्थिती चांगली नव्हती. हिंदुत्व संपण्याची भीती वाटत होती. याचाच विचार त्याच्या डोक्यात सुरू होता. त्याने तीन दाढी असलेल्या व्यक्तींची आणि आरपीएफ जवान मीणा यांची गोळ्या घालून हत्या केली तेव्हा तो मानसिक आजारी होता.”
आरपीएफ जवानाच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा
प्रियांका म्हणाली की, “चेतनच्या डोक्यात काल्पनिक गोष्टी सुरू होत्या. हिंदुत्व धोक्यात असल्याचा विचार त्याच्या डोक्यात सुरू होते.” प्रियांकाने असेही सांगितलं की, “त्याला त्याचा अर्धा पगार राम मंदिराच्या उभारणीसाठी द्यायचा होता. त्यामुळे त्याचे बँक खाते गोठवण्यात यावे.”









