
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपने युती करत राज्यात सरकार स्थापन केलंय. मात्र, आता भाजपमुळेच शिंदे गटाचं (बाळासाहेबांची शिवसेना) टेन्शन वाढलंय. भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी मिशन 144 निश्चित केलंय. यात महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांचाही समावेश आहे. महत्त्वाचं खरी शिवसेना म्हणवणाऱ्या शिंदे गटाच्या बाल्लेकिल्ल्यावरच भाजपनं दावा ठोकलाय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची याच बाल्लेकिल्ल्यात म्हणजे औरंगाबादेत सभा होतेय. त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जाताहेत.
2024 मध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसलीये. भाजपनं मिशन 144 निश्चित केलंय. त्यासाठी प्रत्यक्ष स्थानिक पातळीवर पक्ष बांधणीही सुरू केलीये. भाजपच्या मिशन 144 मध्ये महाराष्ट्रातील 16 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यातीलच एक आहे, औरंगाबाद.
औरंगाबादमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची सभा होतेय. औरंगाबाद शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सायंकाळी 5 वाजता जेपी नड्डा यांची सभा होणार आहे. त्याचबरोबर चंद्रपूरमध्येही नड्डांची सभा होणार आहे. पण, चर्चा होतेय ती औरंगाबादेतील सभेची.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेना सातत्यानं जिंकत आलीये. 2019 मध्ये शिवसेनेला पराभव स्वीकारावा लागला. शिवसेना-भाजप युतीच्या काळात औरंगाबाद मतदारसंघ भाजपनं शिवसेनेलाच सोडला आहे.
आता परिस्थिती बदलली आहे. आता शिवसेनेत फूट पडलीये. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाने स्वतःला खरी शिवसेना म्हणत भाजपसोबत युती केलीये. भाजपकडून शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचं सांगत आहे. त्यामुळे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाला सोडणं राजकीय वाटाघाटीनुसार अपेक्षित आहे. असं असलं तरी दुसरीकडे भाजपनं औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे.
भाजपचे औरंगाबाद शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी पत्रकार परिषदेतच हे स्पष्ट केलं. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ भाजप लढणार असून, त्यासाठी मागील काही वर्षांपासून काम करीत आहोत, असं बोराळकरांनी स्पष्ट केलंय. औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे. औरंगाबादमधील दोन विधानसभा मतदारसंघ, औरंगाबाद महापालिका, औरंगाबाद जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघातही शिवसेनेचा वरचष्मा राहिलेला आहे.
सध्या औरंगाबाद जिल्ह्यातील जे शिवसेनेचे आमदार आहेत, ते शिंदे गटात आहेत. असं असतानाच भाजपनं औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावर दावा केल्यानं भाजप शिवसेनेचा म्हणजेच शिंदे गटाच्या बालेकिल्ला बळकावण्याची तयारी जोरात सुरू केलीये, अशी चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे.
भाजपचं मिशन 144 शिंदे गटाची चिंता वाढवणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. या मागचं मुख्य कारण म्हणजे भाजपने महाराष्ट्रातील जे 16 मतदारसंघ निश्चित केले आहेत. त्यात निम्मे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचे आहे. सध्या शिंदे गटात असलेल्या खासदारांच्या मतदारसंघातही भाजपचं मिशन 144 सुरू झालेलं आहे.
केद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी औरंगाबादेत झालेल्या पत्रकार परिषदेत चार मतदारसंघाची नाव सांगितली. औरंगाबाद, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद मतदारसंघात भाजपन निवडणूक लढवणार असल्याचं कराड म्हणाले. यात हे चारही मतदारसंघ शिवसेनेकडे राहिलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे हिंगोल लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील शिंदे गटात आहे.
भाजपच्या लोकसभेसाठीच्या मिशनमध्ये चंद्रपूर, हिंगोली, बुलडाणा, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर लोकसभा मतदारसंघांचाही समावेश आहे. यातील बहुतांश लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाकडे आहेत. महत्त्वाचं म्हणजे इथले खासदार शिंदे गटात आहे. कल्याण मतदारसंघात तर शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदेंच खासदार आहेत. त्यामुळे भाजपकडून शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम सुरू असल्याच्या चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत.