जितेंद्र आव्हाडांना विस्मरणाचा रोग झालाय – देवेंद्र फडणवीस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लॉकडाउन काळात मदतीच्या पॅकेजवरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा कलगीतुरा रंगला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील जनतेशी संवाद साधताना दोन दिवसांमध्ये योग्य पर्याय मिळाला नाही तर लॉकडाउन लावलं जाईल असा इशारा दिला. पाश्चिमात्य देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लॉकडाउन लावण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी भाषणात सांगितलं. ज्यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन पाश्चिमात्य देशांनी आपल्या देशातील लोकांच्या रोजगारासाठी कसं पॅकेज जाहीर केलं याचे दाखले देत सरकारला टोला लगावला.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर फडणवीस आणि आव्हाडांमध्ये पुन्हा ट्विटर वॉर

फडणवीसांच्या या ट्विटला उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तुम्ही नमुद केलेल्या देशांमध्ये सर्व पैसा हा केंद्र सरकारने दिला, आपलं केंद्र सरकार काय मदत करणार? तुमचं वजन वापरुन पैसे मिळवता आले तर पहा असं उत्तर दिलं. आव्हाडांच्या या टीकेला उत्तर देताना फडणवीसांनी…जितेंद्र आव्हाडांना विस्मरणाचा रोग झाला असल्याचं म्हटलं आहे. “जितेंद्र आव्हाडांना विस्मरणाचा रोग झाला आहे. महाराष्ट्र हे एकमेव असं राज्य आहे की ज्याने कोरोना काळात लॉकडाउन केल्यानंतर नागरिकांना कोणतीही मदत केली नाही. केंद्र सरकारने २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं, परंतू महाराष्ट्राने एक पैसाही नागरिकांना मदतीसाठी दिला नाही.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यावेळी बोलत असताना फडणवीसांनी पंतप्रधान मोदींनी देशात पहिल्यांदा लॉकडाउन जाहीर केलं तेव्हा प्रत्येक घटकातील नागरिकांची काळजी घेतली असं सांगितलं. “ लॉकडाउन जाहीर करताना मोदींनी प्रत्येकासाठी काही ना काही उपाययोजना केल्या होत्या. प्रत्येकाच्या घरी अन्नधान्य पोहचेल अशी व्यवस्था केली. गरजूंच्या खात्यात पैसे जातील याचंही नियोजन केलं. राज्य सरकारने कोणतंही पॅकेज न देता लोकांची वीज कापून त्यांना त्रास दिला”, असंही फडणवीस म्हणाले. सध्या राज्यात लॉकडाउनला विरोध करणारा विरोधीपक्ष देशात मोदींनी अचानक लॉकडाउन केलं तेव्हा कुठे होता असा आरोप सत्ताधारी पक्षाकडून वारंवार केला जात होता. या आरोपाला उत्तर देताना फडणवीसांनी भाजपची बाजू मांडली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका करताना देवेंद्र फडणवीसांनी, कालचं भाषण मुख्यमंत्र्यांनी का केलं हेच मला समजलं नाही असं म्हटलं. त्या भाषणात कोणत्याही उपाययोजना नव्हत्या, कुठलेही निर्णय नव्हते. तज्ज्ञांशी बोलून दोन दिवसांनी निर्णय घेऊ एवढंच त्यांनी सांगितलं. लॉकडाउन करताना त्याकाळात नागरिकांना कशा पद्धतीने मदत केली जाईल हे सांगणं गरजेचं होतं असं म्हणून फडणवीसांनी ठाकरेंना टोला लगावला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT