
मुंबई: कोरोनाचा (Corona) नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने (Omaicron ) आता अधिक चिंता वाढवली आहे. कारण राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या वाटेवर असल्याचं अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने तात्काळ कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निर्बंध घालण्यात आल्यानंतर आता संपूर्ण राज्यात कडक निर्बंध (New Guidelines for Maharashtra) लागू करण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी जमावबंदी लागू केली गेली आहे. याशिवाय लग्न सोहळे आणि इतर कार्यक्रम फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत करण्यासच परवानगी देण्यात आली आहे.
पाहा नव्या नियमावलीत नेमकं काय आहे:
विवाह सोहळा हा बंदिस्त जागेत असो किंवा खुल्या जागेत असला तरी उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या ही फक्त 50 व्यक्तींपुरती मर्यादित असेल.
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रमासाठी देखील फक्त 50 लोकांनाच उपस्थित राहण्यास परवानगी
अंत्यसंस्कारासाठी जास्तीत जास्त संख्या 20 जणांनाच परवानगी
राज्यातील पर्यटन स्थळे किंवा इतर ठिकाणं तिथे स्थानिक प्रशासनाला कलम 144 लागू करण्याचा अधिकार
आधीच अस्तित्वात असलेले इतर सर्व निर्बंधही लागू राहतील
नव्या नियमावलीनुसार लग्न अथवा इतर सार्वजनिक कार्यक्रमांस फक्त 50 लोकांनाच उपस्थितीत राहता येणार आहे. तसंच, अंत्यसंस्कारासाठी फक्त 20 जणांनाच परवानगी आहे. त्याचबरोबर थर्टी फस्ट आणि न्यू इयर सेलिब्रेशन लक्षात घेऊन राज्यात विविध सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी पर्यटनस्ठळी कलम 144 लागू करण्यात आले आहे.